पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत आत्मनिर्भर व विकसित राष्ट्र दिशेने प्रगतीपथावर…

केंद्रीय मंत्री नारायण राणे:संकल्प यात्रा विकास रथ मालवण तालुक्यात दाखल..

⚡मालवण ता.०४-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत देश प्रगतीपथावर वाटचाल करत आहे. आत्मनिर्भर व विकसित राष्ट्र दिशेने मार्गक्रमण करत असलेला भारत 2047 पर्यत जगात महासत्ता बनेल. असा ठाम विश्वास केंद्रीय मंत्री ना नारायण राणे यांनी मालवण वायंगवडे गावात विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमात व्यक्त व्यक्त केला.

विकसित भारत संकल्प यात्रा देशव्यापी मोहीम सुरु आहे. या पार्श्वभूमीवर संकल्प यात्रा विकास रथ मालवण तालुक्यातील वायंगवडे गावात गुरुवारी दाखल झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमाचे उदघाटन केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा नियोजन समिती सदस्य अशोक सावंत, उप विभागीय अधिकारी प्रशांत पानवलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, तहसीलदार वर्षा झालटे, गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर, वायंगवडे सरपंच विशाखा सकपाळ, कृषी अधिकारी संजय गोसावी, उपसरपंच विनायक परब, जेष्ठ कार्यकर्ते जयवंत परब, पोईप सरपंच श्रीधर नाईक, संदीप परब यासह अन्य पदाधिकारी विविध खात्याचे अधिकारी, शिक्षक ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी आयुष्यमान भारत हेल्त कार्ड, भाजीपाला मिनिकीट लाभार्थी, बेबी किट, यात्रीकीकरण, पंतप्रधान किसान योजनेच्या लाभार्थ्यांना कार्ड वितरण करून सन्मानित करण्यात आले. यावेळी जयवंत परब, सुषमा परब, सौम्या मेस्त्री, निधी सुद्रीक या लाभार्थ्यांनी विचार मांडले.

यावेळी ना राणे म्हणाले, गावातच मिळणाऱ्या अनेक विविध वस्तूंपासून मोठ्या उद्योग निर्मितीची शक्यता आहे. शेणापासून विविध प्रकारची उत्पादने घेतली जातात. रंग, गॅस, विज निर्मिती होते. फणस, चिंच यांच्या बियांपासून औषधी पावडर मिळते. अनेक आजारांवर उपयोगी आहे. नारळ उद्योगातूनही अनेक प्रकारच्या वस्तू, मोठे उद्योग निर्मितीची शक्यता आहे. गावातील लोकांनी या सर्व गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. उद्योग व्यवसायातून प्रगती साधली पाहिजे. गाव उद्योग विकासातुन प्रगती साधत असताना दरडोई उत्पन्न वाढले पाहिजे. सरपंच यांनीही सर्व योजना गावागावात राबवून विकास साध्य करावा. गावात तंटे, वादविवाद व्हयला देऊ नये असे आवाहनही मंत्री नारायण राणे यांनी केले.

भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी 90 च्या दशकात नारायण राणे यांनी कोकण विकास, महाराष्ट्र विकासाची संकल्पना मांडली. आज कोकण, महाराष्ट्र गतिमान विकासाच्या दिशेने वाटचाल करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकसित भारत संकल्प यात्रा देशभर फिरत आहे. मालवणात या यात्रेचे स्वागत विकासाचे भाग्यविधाते केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते होत आहे. हा खरोखरचं अभिमानाचा क्षण असल्याचे सांगितले.

वायनगवडे येथील प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, महसूल, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांशीही मंत्री राणे यांनी संवाद साधला.

You cannot copy content of this page