असनिये घारपी रस्त्याचे कामवरून संतप्त: काम सुरू न झाल्यास २६ जानेवारी रोजी आमरण उपोषण..
⚡सावंतवाडी ता.१९-: मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून नऊ महिन्यापूर्वी मंजूर झालेल्या असनिये घारपी मुख्य रस्त्याचे काम अद्यापही सुरु न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी स्थानिक आमदार तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयावर धडक दिली. सदर रस्त्याचे काम येत्या काही दिवसात सुरु न झाल्यास २६ जानेवारी पासून आमरण उपोषण छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.
असनिये घारपी या तीन किलोमीटरच्या त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 2 कोटी 75 लाख रुपये मंजूर झाले आहे सदरच्या कामाचे टेंडर करण्यात आले असून या प्रक्रियेला नऊ महिने पूर्ण होत आले आहेत परंतु ज्या ठेकेदाराने हे काम घेतले आहे त्यांनी अद्याप पर्यंत काम सुरू केले नाही. सदर रस्त्याची सध्याची परिस्थिती दयनीय झाली रस्त्यावरील डांबर उकडून निघाले आहे त्यामुळे रस्त्यावरून गाडी चालवणे सोडा साधे पायी चालणे ही मुश्किल झाले आहे रस्त्यावरून दररोजची रहदारी लक्षात घेता मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत शालेय विद्यार्थी तसेच अबालवृद्धांना या रस्त्यावरून चालले कठीण होत आहे. संबंधित विभागाला तसेच ठेकेदार यांचे वेळोवेळी लक्ष वेधूनही त्याचे काम सुरू न झाल्याने अखेर आज सरपंच रेश्मा सावंत उपसरपंच साक्षी सावंत यांच्यासह ग्रामस्थांनी मंत्री केसरकर यांच्या कार्यालयावर धडक दिली यावेळी संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थित ग्रामस्थांनी शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी मंत्री केसरकर यांचे स्विय्य सहाय्यक गजानन नाटेकर यांच्याशी चर्चा केली यावेळी संबंधित ठेकेदाराची दूरध्वनीवरून चर्चा करण्यात आली तसेच मंत्री केसरकर यांचेही लक्ष वेधण्यात आले.
