पालकमंत्री रविद्र चव्हाण यांचे नगरपरिषदेला निर्देश: भाजप पदाधिकाऱ्यांचे मुख्याधिकाऱ्यांना पत्र..
⚡वेंगुर्ला ता.११-: स्वामी विवेकानंदांच्या ऐतिहासिक वेंगुर्ला भेटीची आठवण म्हणून स्वामी विवेकानंद दालन, ई-लायब्ररी आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र याचा प्रस्ताव तात्काळ सादर करावा असे निर्देश पालकमंत्री रविद्र चव्हाण यांनी वेंगुर्ला नगरपरिषदेला दिले आहेत. याबाबतचे पत्र भाजपातर्फे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांना देण्यात आले.
१८९२ सालच्या दरम्यान, स्वामी विवेकानंद वेंगुर्ला येथे आले होते. वेंगुर्ला नगरवाचनालयात त्यांनी हिदीतून भाषण केले होते. त्यांची ही भेट वेंगुर्ल्याच्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना आहे. त्यांच्या या भेटीची आठवण वेंगुर्ल्यात असावी जेणेकरून पुढील पिढीला या भेटीची माहिती होऊन प्रेरणा मिळेल, अशी मागणी आनंदयात्री वाङ्मय मंडळाने पालकमंत्री चव्हाण यांच्याकडे केली होती. तसेच भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, मंडल अध्यक्ष सुहास गवंडळकर, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, आनंदायात्री वाङ्मय मंडळाच्या अध्यक्षा वृंद कांबळी हे याबाबत सतत पाठपुरावा करीत होते. दरम्यान, पालकमंत्री रविद्र चव्हाण यांनी या संदर्भात तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश वेंगुर्ला नगरपरिषदेला दिले आहेत. तशा आशयाचे पत्र भाजपाचे प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, प्रशांत आपटे व प्रशांत खानोलकर यांनी मुख्याधिकारी कंकाळ यांना सादर केले. या दालनामुळे युवा पिढीला स्वामी विवेकानंदांचे विचार प्रेरणा देतील, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि ई-लायब्ररीची सुविधा सुद्धा उपलब्ध होणार आहे. स्वामी विवेकानंदांचे दालन वेंगुर्ल्यात होण्यासाठी चालना मिळाल्याने साहित्यिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
