नितीन वाळके:मालवणच्या पर्यटन आकर्षणात नव्याने भर पडेल…
⚡मालवण ता.१६-:
मालवणातील किल्ले सिंधुदुर्गवर नौदल दिनाच्या पार्श्वभूमीवर किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी जागेच्या विषयावरून चर्चा सुरु असताना किल्ल्याच्या आत किंवा अन्य जागेत पुतळा उभारण्या पेक्षा सिंधुदुर्ग किल्ला आणि राजकोट यांच्या मधल्या समुद्रातील धोंतारा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या खडकावर उभारण्यात यावा, असा विचार मालवण मधील ज्येष्ठ उद्योजक नितीन वाळके यांनी मांडला आहे.
किल्ले सिंधुदुर्गात शिवरायांचा पुतळा उभारल्यास तो एकतर किल्ल्याच्या आत गेल्या शिवाय कोणाच्या दृष्टीक्षेपात येणार नाही. तसेच किल्ले सिंधुदुर्ग ही छत्रपतींचीच निर्मिती असल्याने आणि किल्ल्यातच छत्रपती राजाराम महाराजानी उभारलेले शिवराजेश्वर मंदिरही असल्याने आत आणखी पुतळा उभारणे साजेसे ठरणार नाही. त्या ऐवजी काळाच्या ओघात नष्ट झालेला किल्ल्यातील राजवाडा आणि अन्य इमारतींचे मुळबरहुकुम पुनरूज्जीवन करून त्यात लाईट ॲण्ड साऊंड शो, म्युझीयम आदींची उभारणी करणे अधीक उचीत, यथायोग्य ठरेल. त्याच बरोबर शिवकालापासून किल्ल्यात अस्तित्वात असलेल्या पाणीपुरवठ्याच्या व्यवस्थेचेही पुनरूज्जीवन करून ती कार्यान्वीत करण्यावरही लक्ष केंद्रीत करणे महत्वाचे ठरेल. या सर्व गोष्टींची निर्मिती ही शिवप्रेमी पर्यटकांसाठीही अधिक आकर्षणाची बाब ठरेल, असे नितीन वाळके यांनी म्हटले आहे.
मालवण बंदर जेटी समोरील समुद्रात असलेल्या धोंतारा या खडकावर शिवछत्रपतींचा भव्य पुतळा उभारून तो परीसर सुशोभित केला गेल्यास तो पुतळा किनारपट्टी वरून तर दिसेलच पण समुद्रातून किल्ल्यावर जाता- येताना व किल्ल्याच्या तटावरून आणि भरसमुद्रातूनही सतत सर्वांच्या नजरे समोर राहून प्रेरणा देत राहील. धोंताऱ्यावर महाराजांचा पुतळा उभारून तो संपुर्ण परीसर विकसीत करताना रात्रौच्या वेळी रोषणाईने उजळून टाकता येईल. यामुळे मालवणच्या पर्यटन आकर्षणात एक नविन भर तर पडेल. त्याच बरोबर धोंताऱ्यावर सहजपणे जाण्या- येण्यासाठी एक धक्का उभारल्यास किल्ला प्रवासी वाहतूक करणाऱ्या स्थानिकांना त्या सेवेचा विस्तार करून त्यांच्याही उत्पनात भर घालता येईल. शासनाने या सर्व बाबींचा सांगोपांग विचार करून छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा धोंताऱ्यावरच उभारावा, असे नितीन वाळके यांनी म्हटले आहे.
