गुळुदुवे येथे पूज्य सद्गुरु सदानंदाचार्य स्वामी यांचा पुण्यतिथी महोत्सव संपन्न..
⚡सावंतवाडी ता.०६सहदेव राऊळ- : आपण सर्वांनी साधु संताच्या विचारांची आणि कार्याची उजळणी करण्याची आवश्यकता आहे. साधुसंतांचे व आध्यात्मिक विचार गांभीर्याने घेतले जात नसल्याने समाज चुकीच्या दिशेने जात आहे. पूज्य सद्गुरू सदानंदाचार्य स्वामीजींनी समाजाला श्रेष्ठ अशा अध्यात्म ज्ञानाची शिकवण दिली, असे प्रतिपादन पद्मश्री धर्मभूषण सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांनी गुळदुवे येथे आपल्या आशिर्वचनात केले.
दत्त पद्मनाभ पीठाच्या अखंडित सद्गुरु परंपरेतील ईश्वरी ज्ञानोपदेशक सद्गुरु सदानंदाचार्य स्वामीजी यांचा पुण्यतिथी महोत्सव परंधाम गुळदुवे मठ येथे पद्मश्री विभूषित धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांच्या पावन सान्निध्यात पार पडला. यावेळी माजी आमदार राजन तेली, राष्ट्रवादी काँग्रेस सावंतवाडी तालुकाध्यक्षा अर्चना घारे, बाळा परब श्री माऊली देवस्थान अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते आरोस, श्री परशराम उपरकर माजी आमदार व मनसे जिल्हा अध्यक्ष, श्री हेमंत मराठे उपसरपंच मळेवाड, श्री प्रमोद नाईक उद्योजक शिरोडा आदी उपस्थित होते.
ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी पुढे म्हणाले, साधु संतानी सत्यश्रेष्ठ ईश्वरी ज्ञान घरोघरी जावून पोहोचविले. आपल्यामध्ये जो सच्चिदानंद म्हणजे चैतन्य आहे त्याच्याशी आपल्याला जोडून दिले. प्रत्येकामध्ये आपल्याला ईश्वर पाहण्याची शिकवण दिली. आपण सर्वांनी जातींमधील भेद विसरून हे संपूर्ण विश्व आपले कुटुंब आहे असे समजून बंधुत्वाचे नाते ठेवून वागले पाहिजे यासाठी संतांचा उदार विचार आत्मसात करण्याची आवश्यकता आहे. आपल्यामध्ये असलेल्या ईश्वराशी सांगड घालून दिल्यामुळेच साधुसंताचे श्रेष्ठत्व आहे असे त्यांनी सांगितले.
परंधाम गुळदुवे मठात सकाळच्या सत्रात पूज्य सद्गुरु समाधी स्थानी महापूजा, पूज्य सद्गुरू चरित्र वाचन,सद्गुरु भक्तिमहायज्ञ, काशिविश्वेश्वर स्थानी रुद्राभिषेक व गुळदुवे पंचक्रोशीतील भजनी पथकाद्वारे पारंपारिक पार संपन्न झाले. प्रकट कार्यक्रमात पूज्य सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींचे दिव्य आशीर्वचन संपन्न झाले. सायंकाळी भजन, पालखी उत्सव व पूज्य सद्गुरु आशीर्वचन संपन्न झाले. कार्यक्रमाला गुरुमाता अॅड्. ब्राह्मीदेवीजी, श्री दत्त पद्मनाभ पीठ – संचालक मंडळ, कृपाकांक्षी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने शिष्यगण तमाम हिंदू धर्मीय भाविकांनी सहभाग घेतला. आरती व पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
