शोकसभेत अनेकांनी व्यक्त केले विचार
बांदा ता.०५-: बांदा गावचे सुपुत्र कै सुभाष मोर्ये हे सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातील सखोल अभ्यास असलेले व्यक्तिमत्त्व होते. अनेकांना संकटकाळी मदत करणारे व कोणतेही काम करण्यासाठी प्रेरणा देणारे असे मोर्ये सरांचे काम होते. लहानापासून थोरांपर्यंत समीप होऊन ते आपले कार्य पुढे घेऊन जात असत ते नेहमी म्हणायचे की आपण एखादे काम करण्यास पुढे आले पाहिजे फक्त ते काम समाजाभिमुख असले की आपोआपच अनेकजण त्या कार्यात सहभागी होणार हे नक्की . त्यांना अभिप्रेत असलेली समाजशील व कर्तृत्ववान पिढी बनवून त्यांनी केलेले कार्य पुढे अविरत चालू ठेवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असे मत आयोजीत शोकसभेत अनेकांनी काढले.
अलीकडेच बांदा येथील सुभाष मोर्ये यांचे निधन झाले बांदा शहराच्या वतीने ग्रामस्थांनी येथील श्री देवी भूमिका मंदिरात शोकसभेचे आयोजन केले होते.यावेळी मोर्ये सरांच्या अनेक आठवणीना उपस्थितानी उजाळा दिला. अनेकांना अश्रू अनावर झाले
यावेळी बोलताना ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत म्हणाले, मोर्ये सरांचे कार्य अतुलनीय होते त्यांनी आमच्या सारख्या तरुणांना घडविले आता तुम्ही पुढे येऊन काम केले पाहिजे असे सांगत वेळोवेळी मार्गदर्शन केले. येथील देवस्थानच्या कामात ते हिरहिरीने भाग घेत असायचे त्यांच्या कामात नीटनेटकेपणा असायचा. त्या दिवशीचे काम त्याच दिवशी पूर्ण करायचे मग ते रात्र उशीर झाला तरी चालेल.कारण त्यांनी दुसऱ्या दिवशीच्या कामाचे नियोजन आधीच केलेले असायचे. ते उत्कृष्ट संघटक होते.
यावेळी बोलताना माजी सरपंच मंदार कल्याणकर म्हणाले, मोर्ये सरांचे बांदा शहरातील सर्वच क्षेत्रात मोलाची कामगिरी केली.आपल्या शहरातुन अनेक युवक विविध क्षेत्रात चमकले पाहिजे अशी त्यांची नेहमी धारणा होती. मलाही श्री देव बांदेश्वर मंदिर जीर्णोद्धार वेळी त्यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली.त्यावेळी ते करत असलेले कामाचे चोख नियोजन अनपेक्षित असायचे तसेच बांधकाम करत असताना त्यांचा लक्ष असायचा मला ते आवर्जून काही गोष्टी सांगत असत मंदिरात कधीही या ते काम करताना दिसत असायचे .त्यांनी आपल्या कौशल्याने अनेक कामे वेगळ्या स्थानावर नेऊन ठेवले आहे ते टिकवणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल.
यावेळी बोलताना माजी सरपंच दीपक सावंत म्हणाले, मोर्ये सर हे विद्यार्थीप्रिय होते. त्यांना शाळकरी मुलांशी संवाद करायला आवडत असत ते त्यांच्या खांद्यावर हात घालून त्याला विविध प्रश्न विचारत असत.त्यांच्याकडे वक्तशीरपणा होता.वेळेत काम पूर्ण करणे हा त्यांचा नियम होता. उच्च विचारसरणी असूनही त्यांचे राहणीमान साधे होते
यावेळी गजानन सावंत, दादा विरनोडकर, नागेश मोर्ये, शरद सावंत, श्री बांदेकर यांनी मोर्ये सरांच्या आठवणींना उजाळा दिला
फोटो
शोकसभेस उपस्थित बांदा वासीय
