काळसे येथे भात लावणी महोत्सव उत्साहात ; शंभरहून अधिक शेतकरी, पर्यटकांचा सहभाग…
मालवण, दि प्रतिनिधी
पारंपरिक शेती संस्कृतीची जपणूक करत शेतकऱ्यांच्या कष्टाला आणि भातशेतीला नवी ऊर्जा देण्यासाठी प्रगत शेतकरी गट, काळसे यांच्यावतीने भात लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी मान्यवरांसह पर्यटक आणि स्थानिकांनी प्रत्यक्ष शेताच्या चिखलात उतरून भाताची रोपे लावत या महोत्सवाचा मनमुराद आनंद लुटला. यामुळे दिवसभर काळसेच्या शेतशिवारात प्रचंड उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
या आगळ्यावेगळ्या महोत्सवास कणकवलीचे उपविभागीय कृषी अधिकारी उमाकांत पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर, धामापूरच्या सरपंच परब, काळसेच्या सरपंच काळसेकर, आत्मा अध्यक्ष प्रताप चव्हाण, काळसेकर, माधुरी कुडाळकर, आनंदाश्रय अणावाचे संस्थापक बबन परब, शेतीनिष्ठ पुरस्कारप्राप्त शेतकरी संतोष गावडे, उद्यान पंडित पुरस्कार विजेते उत्तम फोंडेकर, माजी पंचायत समिती सभापती राजेंद्र परब, प्रगत शेतकरी गटाचे अध्यक्ष श्यामसुंदर मालवणकर, उपकृषी अधिकारी धनंजय गावडे, कृषी सेविका स्नेहा खोत, ग्रामविकास अधिकारी शेलटकर आणि माजी विस्तार अधिकारी विनायक चव्हाण उपस्थित होते. याशिवाय शंभरहून अधिक उत्साही शेतकरी व पर्यटकांनी या लावणी महोत्सवात सहभाग नोंदवला.
सकाळपासूनच काळसे येथील शेतशिवारात भात लावणीला सुरुवात झाली. उपस्थित लोकप्रतिनिधी व कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसोबत चिखलात उतरून भाताची रोपे लावली. ग्रामीण जीवनशैलीशी जवळीक साधणारा आणि शेतकऱ्यांच्या अथांग मेहनतीची जाणीव करून देणारा हा अनुभव उपस्थितांसाठी अत्यंत विशेष ठरला.
शेती ही केवळ उदरनिर्वाहाचे साधन नसून ती कोकणच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. आधुनिक युगात शेतीपासून दुरावणाऱ्या नव्या पिढीला पारंपरिक भातशेतीची ओळख व्हावी, शेतकऱ्यांच्या कष्टाचा योग्य सन्मान व्हावा आणि या माध्यमातून ग्रामीण पर्यटनाला चालना मिळावी, हाच या महोत्सवामागील मुख्य उद्देश आहे असे आयोजकांनी स्पष्ट केले.
दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमात कृषी अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, शेतकरी आणि पर्यटक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. उपस्थितांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत भात लावणी महोत्सवाची ही सुंदर परंपरा दरवर्षी अशीच पुढे सुरू ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
