तोंडवळी तळाशील येथील बंधारा गेला वाहून

आ वैभव नाईक आहेत जबाबदार:
मनसेच्या अमित इंब्रामापुरकर यांचा आरोप

मालवण, दि प्रतिनिधी
पहिल्याच पावसाळ्यात जोरदार लाटांच्या तडाख्याने तोंडवळी तळाशील येथील धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचा काही भाग ढासळला आहे. यावरून हे काम निकृष्ट प्रकारे होत असून याला आमदार वैभव नाईक हे जबाबदार असल्याचा गंभीर आरोप मालवणच्या मनसे पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या निकृष्ट कामाची तक्रार मनसे नेते माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ठेकेदाराने हे निकृष्ट काम सुधारल्यानंतरच बिल अदा करावे अशी मागणी मनविसेचे पदाधिकारी अमित इब्रामपूरकर यांनी पतन विभागाच्या अधिकाऱ्यांना केली आहे.

दरम्यान, पत्तन विभागाचे शाखा अभियंता प्रमोद मोडक यांनी या कामाचे बिल अदा करण्यात आलेले नाही. काम सुस्थितीत आल्यानंतरच अदा करणार असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी विनोद सांडव, अमित इब्रामपूरकर, मनसे विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष प्रतिक कुबल, तालुकाध्यक्ष संदीप लाड, संदीप रेवंडकर, कुणाल चोडणेकर, कुणाल माळवदे व अन्य मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. आज सकाळी तळाशील तोंडवळी येथील सुरू असलेल्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची पाहणी माजी तालुकाध्यक्ष विनोद सांडव व अमित इब्रामपूरकर यांच्या नेतृत्वाखाली मनसे पदाधिकाऱ्यांनी केली. त्यावेळी काम सुरू असलेल्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचा काही भाग ढासळला असल्याचे निदर्शनास आले. बंधाऱ्याची उंचीही काही ठिकाणी कमी असल्याचेही आल्याचे पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. या निकृष्ट कामाला आमदार वैभव नाईक जबाबदार असून भूमिपूजन केल्यानंतर काम सुरू असताना पतन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन असलेल्या कामासंदर्भात आढावा बैठक घेणे तसेच पावसाळ्यात गावात अन्य ठिकाणी होणाऱ्या पडझडीच्या उपाययोजना आखणे आवश्यक होते. बाळा पेडणेकर ते नरेंद्र मेस्त यांच्या घराजवळचा गाळ ड्रेझरच्या सहाय्याने येत्या चार महिन्यात उपसा करणार हे वर्षभरापूर्वी वैभव नाईक यांनी सांगितले होते त्याचे पुढे काय झाले ? म्हणजेच भूमिपूजन झाल्यानंतर थेट उद्घाटनाचा कार्यक्रम उरकून घेण्याची सवय असलेल्या आमदारांनी तळाशील तोंडवळी येथील कामांवर जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप मनसेच्या वतीने यावेळी करण्यात आला.

You cannot copy content of this page