मेळाव्यातून विवाह गाठ बांधली जावी – एस.आर.डौर

⚡वेंगुर्ला ता.०२-: वधूवर सुचक मेळावा हा स्तुस्त्य उपक्रम आहे. लाभार्थ्यांनी आपला जोडीदार निवडताना दोन पाऊले मागे व दोन पाऊले पुढे येऊन निर्णय घेतला तर वधूवर मेळाव्याची खरी फलश्रुती होईल. या मेळाव्यातून जिल्ह्यातील युवक युवतींची विवाह गाठ बांधली जावी अशी अपेक्षा नागरी हक्क संरक्षण विभाग सिधुदुर्गचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एस.आर.डौर यांनी कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केली.

  ओरोस-आदर्शनगर येथील पंचशील ट्रस्टच्यावतीने समाज जोडो अभियानाच्या संकल्पनेतून ‘जुळून येती रेशीमगाठी‘च्या माध्यमातून प्रथमच दीक्षित व अदीक्षित वधूवर परिचय मेळावा २६ मार्च रोजी श्री रवळनाथ मंदिर रंगमंच ओरोस येथे संपन्न झाला. या मेळाव्यात जिल्ह्यातील २४ मुलगे व १२ मुली अशा एकूण ३६ जणांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सहभाग घेतला.

  कार्यक्रमाची सुरुवात बुद्धवंदना, संविधानाचे वाचन, फुले-शाहू-आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन तसेच दीपप्रज्वलाने करण्यात आली. यावेळी नागरी हक्क संरक्षण विभाग सिधुदुर्गचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एस.आर.डौर, पंचशील ट्रस्टचे अध्यक्ष संजय खोटलेकर, कै.सौ.रुक्मिणी फटू मठकर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष एन.पी.मठकर, माजी पंचायत समिती सदस्य (कुडाळ) सुप्रिया वालावलकर, ओरोस उपसरपंच महादेव घाडीगांवकर, ओरोस येथील बौद्ध उपासक सहदेव ओरोसकर, जागरुक नागरिक सेचा संघ ओरोसचे अरविद सावंत आदी उपस्थित होते. या प्रमुख मान्यवरांसह शुद्धोदन इंगळे, आनंद धामापुरकर, देवानंद मिठबांवकर, अंकुश तावडे यांचा सत्कार करण्यात आला.

  उपस्थित पालकांमधून किशोर कांबळे, ज्ञानेश्वर जाधव, संदेश डिकवलकर, संजिवनी पालयेकर, संदिप तांबे, देवानंद मिठबांवकर यांनी मार्गदर्शन केले. 

  जिल्ह्यातील मुलामुलींना आपल्या भावी आयुष्याचा जोडीदार निवडण्याची संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल संजय खोटलेकर व एन.पी.मठकर यांचे आभार मानले.
You cannot copy content of this page