सिंधुदुर्गातील २३० कर्मचाऱ्यांना दिलासा
कणकवली : राज्यातील आरोग्य विभागात १० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ सेवा बजावणाऱ्या १५,०१० अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अधिसंख्य पदावर एक वेळची विशेष बाब म्हणून समायोजन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयाबद्दल राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी संघटना, सिंधुदुर्गच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी भेट घेऊन आभार व्यक्त केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली, खासदार नारायण राणे यांच्या संकल्पनेतून तसेच आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नांमुळे हा निर्णय झाल्याबद्दल संघटनेने कृतज्ञता व्यक्त केली. या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे २३० कर्मचाऱ्यांचे आरोग्य विभागात समायोजन होणार असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याबरोबरच जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम व बळकट होण्यास मदत होणार असल्याची भावना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर, राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष हेमदिप पाताडे, अजित सावंत, रश्मी सोहनी, स्वाती जळवी, क्रांती तोरसकर, सागर चव्हाण, अंकिता तेली, दीपक रहाटे, आदिती चव्हाण, प्रसाद यादव, शारदा तावडे, नेहा अनवकर आदी उपस्थित होते.
