आज निवडणूक आयोगावरचा विश्वास उडाला: खास.संजय राऊत
⚡कणकवली ता.१७-: श्रीरामाचा धनुष्यबाण रावणाला मिळत असेल, तर सत्यमेव जयतेऐवजी असत्यमेव जयते म्हणावं लागेल. खरेदी-विक्री कुठपर्यंत गेली आहे, हे आता स्पष्ट झालं.’खोक्यांचा वारेमाप वापर झाला. हा खोक्यांचा विजय आहे. हा सत्याचा नाही, असत्याचा विजय आहे. जो पक्ष बाळासाहेब ठाकरेंनी आणि लाखो शिवसैनिकांनी रक्त आणि बलिदान देऊन उभा केला, तो पक्ष 40 बाजारबुंडगे विकत घेतात. आज निवडणूक आयोगावरचा विश्वास उडाला, अशी प्रतिक्रीया शिवसेना खास.संजय राऊत यांनी व्यक्त केली.
कणकवली येथे खासदार संजय राऊत यांचे जंगी स्वागत करण्यात आले यानंतर शिवसेना आणि धनुष्यबाण बाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना खासदार राऊत म्हणाले,, ‘या देशातल्या सर्व स्वायत्त यंत्रणांना गुलाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यातले हे महत्वाचे पाऊल आहे. न्यायालय असेल, निवडणूक आयोग असेल, तपास यंत्रणा असेल, या गुलाम असल्यासारख्या वागत आहेत. 40 बाजारबुंडगे पैशांच्या जोरावर बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि चिन्ह विकत घेऊ शकत असतील, तर या देशीतील जनतेचा लोकशाहीवरील विश्वास उडून जाईल. हे सगळं दबावाखाली झालेलं आहे. महाराष्ट्रावर सूड घेण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईवर शिवसेनेचा अधिकार राहू नये, त्यासाठी फेकलेला फास आहे, असेही खास.राऊत म्हणाले.
