ब्रह्मज्ञानामुळे आलेली स्थिरता ही जीवनात मुक्तीमार्गाला प्रशस्त करते: माता सुदीक्षाजी महाराज

⚡कणकवली ता.०४-: “ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीने जीवनामध्ये वास्तविक भक्तिचा प्रारंभ होतो आणि त्याच्या स्थिरतेने आपले जीवन भक्तिमय व आनंदीत होऊन जाते.’’ असे उद्गार सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी नववर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष सत्संग समारोह प्रसंगी उपस्थित समस्त भक्तगणांना संबोधित करताना व्यक्त केले. या कार्यक्रमाचा दिल्ली तसेच एन.सी.आर. सह अन्य ठिकाणाहून देखील हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाविक-भक्तगणांनी व्हर्चुअल माध्यमातून लाभ घेतला.

सद्गुरु माताजींनी ब्रह्मज्ञानाचे महत्व अधोरेखित करताना सांगितले की, ब्रह्मज्ञानाचा अर्थ क्षणोक्षणी परमात्मारूपी दिव्य प्रकाशात विचरण करणे होय. ही अवस्था आपल्या जीवनात तेव्हा येते जेव्हा यावरील दृढता नित्य टिकून राहिल आणि तेव्हाच खऱ्याअर्थाने मुक्ती प्राप्त होईल.  मायेच्या प्रभावापासुन स्वत:ला बचाव करुन जीवनाचा खरा उद्देश परमात्मा प्राप्ती आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्याला जाणून घेण्यासाठी प्रयत्नशिल राहिले पाहीजे. या जगामध्ये निरंकार ईश्वर आणि माया या दोहोंचा प्रभाव कायम असतो. यास्तव आपल्याला निरंकाराशी संलग्न राहून भक्ति केली पाहिजे. आपल्या जीवनात सेवा, सुमिरण, सत्संगला केवळ एक क्रियाकर्म किंवा हजेरीसाठी नव्हे तर निरंकार प्रभूशी वास्तविक रूपात एकरूप होऊन स्वत:चे कल्याण करायचे आहे. 
मुक्तीच्या मार्गाचा उल्लेख करुन सद्गुरु माताजींनी सांगितले की, ज्यांनी खऱ्या अर्थाने ब्रह्मज्ञानाची दिव्यता समजून घेतली आणि त्याचा आपल्या जीवनात अंगीकार केला अशा संतांनाच मुक्ती मिळते. जीवनाचे महत्व आणि मोल तेव्हाच होते जेव्हा ते वास्तवात जगले जाते केवळ दिखाव्यासाठी नाही. आपण सर्व नित्य निरंतर क्षणोक्षणी या निरंकार प्रभूशी जोडून राहणे हीच खरी भक्ती होय.
शेवटी सद्गुरु माताजींनी सर्वांसाठी हीच प्रार्थना केली, की आपण सर्वांनी आपल्या उत्तम आचरणाने आणि भक्तीमय जीवनाने अवघ्या जगाला प्रभावित करत सुखद आणि आनंदाने परिपूर्ण जीवन जगावे. निरंकाराचा आधार घेऊन सर्व संतांचे जीवन मंगलमय व आनंदमय होवो.
You cannot copy content of this page