कणकवली पर्यटन महोत्सवाचा उद्या शानदार शुभारंभ होणार

भव्य शोभायात्रा ,आकर्षक चित्ररथ,सिने सृष्टीतील दिग्गज कलाकारांची अदाकारी;
ना. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन

⚡कणकवली ता.०४-: भव्य शोभायात्रा ,आकर्षक चित्ररथ,सिने सृष्टीतील दिग्गज कलाकारांची अदाकारी आणि खवय्यांसाठी पर्वणी ठरणारा कणकवली पर्यटन महोत्सव ५ ते ८ जानेवारी या कालावधीत होत आहे. या महोत्सवात राज्यभरातील कलाकारांची मांदियाळी असणार आहे. महोत्सवाचे ५ जानेवारी रोजी सायं. ७ वा. जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. तर समारोप ८ रोजी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत होणार आहे. शुभारंभावेळी शहरातून भव्य चित्ररथ स्पर्धा व शोभायात्रा काढण्यात येणार आहे. महोत्सवाच्यानिमत्ताने सिने टीव्ही कलाकारांचे कार्यक्रम, फूडफेस्टिव्हल, स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम यामुळे चार दिवस कणकवलीवासियांना मेजवानीच मिळणार आहे. कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.
गुरुवार ५ जानेवारी रोजी सायं ४ वा. पटकीदेवी मंदिर ते मुख्य चौकातून महोत्सव स्थळापर्यंत भव्य चित्ररथ स्पर्धा व शोभायात्रा काढण्यात येणार आहे. याचवेळी महोत्सव स्थळी फूडफेस्टिव्हलचेही उद्घाटन होणार आहे. सायं. ६ वा. किडस् फॅशन शो होणार आहे. ७ वा. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी माजी खासदार नीलेश राणे, आमदार नीतेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, जि. प. माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी. उपाध्यक्ष अतुल काळसेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यानंतर बेधुंद धमाल कॉमेडी शो व ऑर्केस्टा होणार आहे. यामध्ये मराठीतील आघाडीचे विनोदवीर प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, श्यामसुंदर राजपूत, चेतना भट, गायक कविता राम, अमृता नातू फेम विश्वजीत बोरगावकर यांच्या सुपरहीट कलेचा आनंद लुटता येणार आहे. या कार्यक्रमाचे निवेदन ऐश्वर्या धपकर करणार आहे

शुक्रवार ६ जानेवारी रोजी रात्री ८ वा. सुहास वरुणकर, हरिभाऊ भिसे, संजय मालंडकर यांच्या संकल्पनेतून स्थानिक कलाकारांचा कनकसंध्या कलाविष्कार हा कार्यक्रम होणार आहे. शनिवार ७ रोजी सायं. ७.३० वा. भाई साटम आणि ५० सहकारी ‘मनी आहे भाव, देवा मला पाव’ हा आध्यात्मिक आणि विनोदी कार्यक्रम सादर करणार आहेत. रात्री ८ वा. सेलिब्रेटी कलाकारांचा जल्लोष व नृत्य, गायनाचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये पार्श्वगायिका वैशाली माडे, स्वप्नील गोडबोले, इंडियन आयडॉल फेम सायली कांबळे यांच्या गायनासोबतच हेमलता बाणे, लावणीसम्राज्ञी विजया कदम यांचे डान्स होणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध कलाकार दिगंबर नाईक व हेमांगी कवी करणार आहेत.

महोत्सवाचा समारोप रविवार ८ जानेवारी रोजी सायं. ७ वा. होणार आहे. यावेळी केंद्रीयमंत्री नारायण राणे, आमदार नीतेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तर रात्री ८ वा. ख्यातनाम गायक, अनेक गायन कार्यक्रमांचे परीक्षण करणारे जावेद अली लाईव्ह यांचा ‘तेरी झलक.. हा कार्यक्रम होणार आहे.

कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे तसेच नगरसेवकांनी केले आहे.

You cannot copy content of this page