ब्रिगेडियर सुधीर सावंत यांची इच्छा
देवगड प्रतिनिधी
विजयदुर्ग बंदर विकसीत झाले तर येथील हापूस आंब्याला मोठया प्रमाणात परदेशातून मागणी वाढु शकते यामुळे ठराविक देशांमध्ये जाणारा हापूस आंबा अखंड जगभर पोहचून आंब्याला चांगला भाव मिळु शकतो यामुळे विजयदुर्ग बंदर विकसित होणे गरजेचे आहे. असे मत बिग्रेडियर सुधिर सावंत यांनी देवगड येथे व्यक्त केले.
देवगड बाळासाहेबांची शिवसेना कार्याल्यामध्ये बिग्रेडियर माजी खासदार सुधिर सावंत यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी तालुकाप्रमुख अमोल लोके,तुषार पेडणेकर,सुनिल पारकर,डॉ. विलास सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना बिग्रेडियर सुधिर सावंत म्हणाले की, बाळासाहेबांची शिवसेना हे सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका पहिल्यांदाच लढवित आहे. यामुळे या पक्षाच्या माध्यमातून जाहीरनामा ग्रामपंचायत निवडणुकिसाठी प्रसिध्द करण्यात आला आहे. कृषी पर्यटन गावातील प्रत्येकाला स्वावलंबी करणे, नैसर्गिक पध्दतीने शेतीचे उत्पादन वाढविणे, गावातील पिकांच्या स्थानिक जातीचे संवर्धन करणे, पिण्याचे पाणी व सिंचनासाठी पाणी उपलब्ध करणे, असे गाव समृध्द करण्याच्या अनेक विकासात्मक योजना त्यांनी जाहिरनाम्यामध्ये प्रसिध्द केले आहे. तसेच समृध्द आणि आनंदी गावातील विकासाच्या संकल्पनेमध्ये रोजगार,समूह शेती,नैसर्गिक शेती,लघू उदयोग,कृषि आधारीत उदयोग,पशुसंवर्धन,पिण्याचे व सिंचनाचे पाणी,शिक्षण,आरोग्य,क्रिडा,संस्कृती,कृषी पर्यटन,जमिनीचे आरोग्य, पर्यावरण या गोष्टींचा समावेश करुन विकास साधता येईल असे देखील त्यांनी जाहीरनाम्यामध्ये प्रसिध्द केले आहे.
कृषी विदयालय किर्लोस व स.ह.केळकर महाविदयालयाच्या माध्यमातून देवगड हापूस आंब्यामध्ये साका कमी होण्यासाठी व आंबा खराब होण्याचे प्रमाण कमी होण्यासाठी संशोधन केले जात असून यासाठी वेगवेगळया उपाय योजना देखील केल्या जात आहेत. देवगडचा हापूस आंबा हा जगप्रसिध्द हापूस आंबा असून या हापूस आंब्याची गुणवत्ता कमी होता कामा नये यासाठी आपण रासायनिक खतांचा वापर कमी करुन सेंद्रीय खत वापरुन आंब्याची गुणवत्ता टिकून राहण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. कल्टारमुळे देवगड हापूस आंब्याची बदनामी होत आहे. हे या कल्टार वापरावरती देखील बंदी घालण्यासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत. नैसर्गिक रित्या शेती करुन फळबागायतींची मशागत करुन शेतक-यांचे उत्पन्न वाढविणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच देवगडमध्ये आंबा मार्केट उभारण्यासाठी देखील आपली मागणी असून त्या दृष्टीकोनातून आपण मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करणार आहोत. व सदया मुंबई येथे ट्रकवाहतुकीमधून जाणारा आंबा रेल्वेमध्ये रो रो सेवा हि उपलब्ध करुन देण्यासाठी आपले प्रयत्न असणार आहेत. असे मत त्यांनी व्यक्त केले.
