परमहंस भालचंद्र महाराज यांची शहरातून भव्य दिव्य पालखी मिरवणूक
⚡कणकवली ता.३०-: पायी हळू हळू चाला… मुखाने भालचंद्र बोला…भालचंद्र महाराज की जय…अशा नाम घोषात योगी यांचे योगी, असंख्य भाविक भक्तांचे श्रद्धास्थान, कनकाधिपती परमहंस भालचंद्र महाराज यांची शहरातून भव्य दिव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. हा पालखी सोहळा जणू काही विठूरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या आळंदी व देहुतील पालखी सोहळ्यासारखा होता. हा सोहळा पाहून भाविक- भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी ज्याप्रमाणे रथ असतो, तशाच प्रकारचा रथ
भालचंद्र महाराजांच्या पालखी मिरवणूकीत बैलांनी जुंपलेला आकर्षक रथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.या पलाखी सोहळ्यात अबालवृद्ध सहभागी झाले होते.
परमहंस भालचंद्र महाराज यांचा 45 वा पुण्यतिथी दिन सोहळा बुधवारी मंगलमय व भक्तीमय वातावरणात पार पडला. समाधीपूजन, काकड आरती तसेच पहाटे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. तद्नंतर समाधीस्थानी
मन्यूसूक्त पंचामृताभिषेक तसेच बाबांच्या समाधीस्थळी किरणोत्सव पार पडला. चंदनाच्या लेपात बाबांच्या बाळ मूर्तीसोबत संस्थान परिसरातील देवतांची भेट घेत पुन्हा समाधी स्थळी बाबांची मूर्ती ठेवण्यात आली.त्यानंतर दुपारी भालचंद्र महाराज यांची महारती झाली. यात भाविकांचा महासागर लोटला होता.
त्यानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. भजनी कलाकरांनी भजने सादर करून वातावरण भक्तीमय केले.
सायंकाळी उंट, घोडे यांच्यासमवेत वारकरी व असंख्य भाविकांच्या उपस्थितीत भालचंद्र महाराज संस्थाकडून भालचंद्र महाराज यांच्या पालखी मिरवणूक सुरुवात झाली. ही पालखी मिरवणूक पटकीदेवी, ढालकाढी, तेलीआळी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, आप्पासाहेब पटवधर्वन
चौक, बाजारपेठ मार्गे संस्थानात दाखल झाली. पालखी सोहळ्यात वारकरी व भक्तांनी भालचंद्र महाराज यांच्या नामाचा जयघोष
केला. रात्रौ दैनंदीन आरती पार पडली. त्यानंतर अमृतनाथ नाट्यमंडळ,म्हापण यांचे कुर्मदासाची वारी हे नाटक सादर झाले. हे नाट्यपाहण्यासाठी रसिकांनी गर्दी केली होती.
