⚡वेंगुर्ला ता.०३-: आनंदयात्री वाङ्मय मंडळाच्या डिसेंबरमध्ये होणा-या तिस-या मराठी त्रैवार्षिक साहित्य संमेलनाच्या निमित्ताने वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. वक्तृत्व स्पर्धेसाठी शालेय गट (आठवी ते दहावी) असून ‘माझा आवडता लेखक‘ या विषयावर किमान ४ मिनिटे ते कमाल ५ मिनिटे सादरीकरणाचा वेळ असेल. दुसरा खुला गट (अकरावीपासून पुढील) असून ‘वाचन संस्कृतीची गरज‘ या विषयावर किमान ६ मिनिटे ते कमाल ७ मिनिटे स्पर्धकाने आपले विचार मांडायचे आहेत. दोन्ही गटातील वक्तृत्व स्पर्धा ८ डिसेंबर रोजी बॅ.खर्डेकर महाविद्यालय येथे सकाळी ९ वा. सुरू होतील.
निबंध स्पर्धा ही अकरावीपासून पुढे खुल्या गटासाठी आयोजित केली असून ‘साहित्य आणि मानवी जीवन‘ या विषयावर कमाल बाराशे शब्दांपर्यंतचा निबंध २५ नोव्हेंबर पर्यंत स्वहस्ताक्षरात लिहून पोष्टाने पुढील पत्यावर पाठवावा. निबंध सुवाच्च अक्षरात, योग्य समास सोडून कागदाच्या एकाच बाजूवर लिहिलेला असावा. निबंध संपादक, साप्ताहिक किरात कार्यालय, बॅ.बी.के.रोड, वेंगुर्ला येथे पाठवावा.
वक्तृत्व स्पर्धा (मोठा गट) प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ प्रथम व द्वितीय क्रमांकासाठी अनुक्रमे रोख रुपये १५००,१०००,५००, २५०, २५० आणि प्रत्येकी चषक व प्रमाणपत्र तर वक्तृत्व (शालेय गट) प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ प्रथम व द्वितीय क्रमांकसाठी अनुक्रमे रोख रुपये १०००, ७००, ५००, २५०, २५०, प्रत्येकी चषक व प्रमाणपत्र देण्यात येतील. तर खुल्या निबंध स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ प्रथम व द्वितीय क्रमांकासाठी अनुक्रमे रोख रुपये १५००, १०००, ५००, २५०, २५० आणि प्रत्येकी चषक व प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप असून सर्व सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. वक्तृत्व स्पर्धेच्या अधिक माहिती करिता संजय पाटील (९८९०६९४७०९) यांच्याशी संफ साधावा असे आवाहन आनंदयात्रीच्यावतीने लेखिका वृंदा कांबळी आणि प्रा.सचिन परुळकर यांनी केले आहे.
आनंदयात्री वाङ्मय मंडळातर्फे वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा
