अन्यथा आंदोलन छेडू ;महेश जावकर यांच्यासह नागरिकांचा इशारा
⚡मालवण ता.११-: मालवण शहरातील चिवला बीच स्मशानभूमी ही पूर्वी सर्व सुविधांनी युक्त म्हणून ओळखली जात असताना मालवण नगरपरिषद व लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे स्मशानभूमीत अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्यांमुळे नागरिकांची अंत्यविधी वेळी मोठी गैरसोय होत आहे, त्यामुळे चिवला बीच स्मशानभूमीतील समस्या तातडीने सोडवाव्यात अशी मागणी करत समस्या न सोडविल्यास आंदोलन छेडले जाईल असा इशारा माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांच्यासह नागरिकांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन सादर केले. या निवेदनावर ६५ नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावेळी महेश जावकर, शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी, माजी नगरसेवक यतीन खोत, पपू लुईस, चंद्रकांत पारकर, निलेश सावंत, बंड्या सरमळकर आदी व इतर उपस्थित होते.
चिवला स्मशानभूमी पूर्वी सुविधा युक्त म्हणून गणली जात होती परंतु बऱ्याच महीन्यापासून नगरपरीषदेच्या तसेच लोकप्रतिनिधंच्या अक्षम्य दुर्लक्ष केल्याने विविध समस्यानी ग्रस्त आहे. या स्मशानभूमी मध्ये अंत्यविधीला गेल्यानंतर शवदाहीनी साठी उभ्या केलेल्या पारई नसल्याने अंत्यविधीच्यावेळी सरणावर लाकडे लावणे शक्य होत नाही, त्यामुळे लाकडे कोसळण्याची शक्यता निर्माण होते. तसेच या स्मशानभूमीत काळोखाचे साम्राज्य पसरलेले आहे एकही लाईट पेटत नाही नगरपरीषदेने बसविलेला लाईट मीटर बंद आहे. त्यामुळे नागरीकांना मोबाईलच्या प्रकाशात अंत्यविधी करावे लागत आहेत. त्याचप्रमाणे नगरपरीषदेच्या वतीने केलेल्या पाण्याची सुविधा सध्या बंद आहे. त्यामुळे त्या ठीकाणी लावलेली झाडांना पाणी मिळत नाही त्यामुळे झाडे सुकून गेलीली आहेत नव्याने केलीली गेट तुटून पडलेली आहेत. या समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात, समस्या सोडविल्या गेल्या नाहीत तर जनआंदोलन करावे लागेल, असे या निवेदनात नागरिकांनी म्हटले आहे
