⚡आंबोली ता.०४-: आंबोली, चौकुळ मधील अवैद्य दारु धंदे बंद करणेबाबत आंबोली व चौकुळ सरपंचानी आंबोली पोलीसांशी आज चर्चा केली.यावेळी आंबोली सरपंच सौ. सावित्री पालेकर, चौकुळ सरपंच सुरेश उर्फ बाबु शेटवे, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष वैभव राऊळ, माजी सरपंच गुलाबराव गावडे, संतोष पालेकर, मंगलबाबु व ग्रामस्थ उपस्थित होते.
यामध्ये प्रामुख्याने बाहेरील गाड्या मोठ्या प्रमाणावर दोन्ही गावात स्थानिकांना अवैद्य दारूचा पुरवठा करत असुन स्थानिक लोक त्याची विक्री करुन तरूण पिढीला व्यसनाधीन करत आहेत. गणपती सणाच्या कालावधीत दारु धंदे मोठ्या प्रमाणात वाढल्याने दारू सहज मिळत असुन घरपोच केली जाते, यामुळे दारू पिऊन आपापसात भांडणे व कौटुंबीक कलह निर्माण होत आहेत. या सर्वांचा परिणाम गावच्या एकोप्यावर सुध्दा होत आहे. तसेच बाहेरून येणा-या पर्यटकांना मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू पुरवली जाते त्यामुळे ते रस्त्याच्या कडेला धिंगाणा घालताना मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. यावेळी उपस्थित असलेले आंबोली पोलीस स्टेशनचे विट अंमलदार दत्ता देसाई यांनी ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व गावचे पोलीस पाटील व ग्रामस्थ यांनी आवश्यक ते सहकार्य केल्यास त्यांच्या मदतीने लवकरच अॅक्शन प्लाॅन तयार करुन अवैद्य दारु धंद्यांचा बिमोड केला जाईल असे आश्वासन दिले.
