डॉ. व्ही.जी.भास्कर ;कणकवली महाविद्यालयात व्याख्यान
⚡कणकवली ता.११-: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त कणकवली कॉलेजमध्ये ”सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वातंत्र्य चळवळ’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विचार मंचावर प्रा. डॉ. राजेंद्रकुमार चौगुले, प्रा.डॉ. सोमनाथ कदम, प्रा.युवराज महालिंगे, पर्यवेक्षक प्रा. मंगलदास कांबळे, व प्रमुख आदी उपस्थित होते.
कोकण भूमी ही रत्नांची खाण आहे इथल्या लोकांनी स्वातंत्र्यापूर्वी देखील संघर्ष केला आहे. या कोकण रत्नामध्ये लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आप्पासाहेब पटवर्धन आदींचा समावेश केला जातो. त्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोलाचे योगदान दिलेले आहे. देशामध्ये दोन व्यक्तींच्या नावामागे गांधीजींच्या नावाचे वलय निर्माण झाले आहे. त्यामध्ये खान अब्दुल गफार खान व आप्पासाहेब पटवर्धन हे आहेत. या दोन्ही मधील आप्पासाहेब हे कोकणचे गांधी म्हणून ओळखले जातात. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये आप्पासाहेब मालवणकर, पंडित केशव देसाई, पटवर्धन बंधू, चिटणीस, चितळे वकील, स.का. पाटील, गजानन पटवर्धन, आबासाहेब वालावलकर यांनी आपले योगदान दिलेले आहे. या चळवळीत जानकीबाई तेंडोलकर, सौ. धडाम, इंदुबाई शिरसाट, म्हाळसाबाई भांडारकर या स्त्रियांनी देखील सहभाग घेतला होता. या लोकांनी स्वातंत्र्यासाठी दिलेल्या योगदानास आजच्या तरुणांनी विसरता कामा नयेत. तसेच जो इतिहास विसरतो त्याला भविष्य नसते असे मत व्यक्त प्रा. डॉ. भास्कर यांनी व्यक्त केले.
प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले यांनी अध्यक्षीय वक्तव्यामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती दिली, राष्ट्रीय कर्तव्याचे पालन करत असताना आपण सर्वांनी त्यामध्ये सहभाग घेतला पाहिले. आजच्या तरुण पिढीला स्वातंत्र्यासाठी बलिदान करावे लागले नाही तर ते मोफत मिळले आहे. आजच्या युवा पिढीवर चांगले संस्कार झाले पाहिजेत. स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी आपल्या कुटुंबाचा त्याग केला आहे त्यामुळे स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण आजच्या तरुण पिढीने करावे व त्यांचे विचार आचरणात आणावे असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविक प्रा. डॉ. सोमनाथ कदम यांनी, सूत्रसंचालन प्रा. सत्यवान राणे यांनी व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. तेजस जयकर यांनी केले. तसेच या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक ,विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
