*💫कणकवली दि.२०-:* मूळचे कणकवली-ओसरगाव येथील आणि सध्या मुंबईत कार्यरत असलेल्या ज्येष्ठ कवी रामदास खरे यांच्या संवेदना प्रकाशन (पुणे) तर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘आता अटळ आहे’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन समारंभ शनिवार 30 जानेवारी रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. कवयित्री प्रा. प्रतिभा सराफ यांच्या हस्ते ‘आता अटळ आहे’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कवी किरण येले, कवी गितेश शिंदे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. कवी खरे हे गेली चाळीस वर्ष निष्ठेने कविता लेखन करत असून यापूर्वीही त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत.त्यानंतर आता त्यांचा ‘आता अटळ आहे’ हा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला असून या संग्रहाला कवी येले यांनी प्रस्तावना लिहिली आहे. तर कवी अजय कांडर यांनी या संग्रहाची संग्रहाच्या मलपृष्ठावर पाठराखण केली आहे. यात कांडर म्हणतात कवी खरे यांची ‘आता अटळ आहे’ या संग्रहातील कविता जगण्याच्या समग्रतेला भिडू पहाते. अनुभवाचे विविध विश्व त्यांच्या कवितेत खुले होत जाते हे या कवितेचे मुख्य बलस्थान आहे.महानगरीय जाणिवेतून व्यक्त होत जाणाऱ्या या कवितेत प्रचंड कोलाहल आहे. त्याचे तीव्रपण वाचकाला भिडत जाताना माणसाचं अस्तित्व नष्ट होत जाणाऱ्या काळाची पुन्हा पुन्हा आठवण ही कविता वाचताना होत राहते.
कवी रामदास खरे यांच्या ‘आता अटळ आहे’ काव्यसंग्रहाचे 30 जाने.रोजी प्रकाशन…
