पावसामुळे पोषक वातावरण
⚡सावंतवाडी ता.०४सहदेव राऊळ-: सर्वत्र पावसाने आता जोरदार सुरुवात केल्यामुळे भात लावणीच्या कामाला तालुक्यात मोठ्या प्रमाणात वेग आला आहे तालुक्यात ठिकठिकाणी तरवा काढणी व भात लावणीच्या कामात शेतकरी व्यस्त झालेले चित्र दिसत आहे.
जिल्ह्यात सध्या समाधानकारक पाऊस कोसळत आहे. मान्सूनपूर्व पावसात काही ठिकाणी पेरणी करून ठेवलेले भात आता पूर्ण वाढले असल्याने तरवा काढणी कामास जोरदार सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी पानथळ (शेळ जमीन) जमिनीत शेतकऱ्यांनी लावणीही सुरु केली आहे.
काही भरडी जमिनीत अजूनही तरवा पेरणी काम सुरु आहे. शेतकऱ्यांचा श्री पद्धतीने भात लागवड व आधुनिक भात बियाणांकडे कल वाढत आहे, मात्र दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी ऐन तरवा काढणी व भात लागवडीच्यावेळी सर्वत्र शेत मजुरांची कमतरता भासत आहे. त्यामुळे काही ठिकाणी घरातील माणसांच्या सहाय्याने भात लावणीस सुरुवात करण्यात आली. तसेच काही ठिकाणी जंगली प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतीचे बऱ्यापैकी प्रमाण कमी झाले आहे, काही ठिकाणी बैल जोडीच्या सहाय्याने तर काही ठिकाणी ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती केली जात आहे.
