कणकवली तालुका भाजपाने प्रांताधिकाऱ्यांकडे केली मागणी
कणकवली ता.२७-:* मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण होत असताना कणकवली तालुक्यातील अनेक समस्या अजून प्रलंबित आहेत. जमीनधारकांना अजून भरपाई मिळालेली नाही. महामार्गाचे काम होणे शिल्लक आहेत. या सर्व बाबी सोडविणे आवश्यक आहे.ओसरगाव टोलनाक्यावर सिंधुदुर्ग जिल्हयातील वाहनांसाठी टोलमाफी देण्यात यावी अशी जिल्हयातील सर्व नागरिकांची मागणी आहे.
त्यामुळे टोलमाफीची कार्यवाही व्हावी अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली. त्याबाबतचे निवेदन कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांना देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, तसेच भूसंपादन झालेल्या लोकांना अद्याप मोबदला मिळालेला नाही. वागदे, गोपुरी आणि उभादेव येथील लोकांचे पैसे मिळालेले नसल्यामुळे तेथील काम अर्धवट आहे. त्यामुळे तेथील वाहतूक ही एका लेनने सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. त्याचप्रमाणे कणकवली शहरातील फ्लायओव्हरवर गर्डर ठेवण्यात आलेले आहेत. ते त्वरीत काढण्यात यावेत. अन्यथा फ्लायओव्हरवर अपघात होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ ची बरीचशी कामे अद्यापही प्रलंबित आहेत. यात ओसरगांव आंबेरकर स्टॉप येथे निवारा शेड बांधणे, वागदे-टेंबवाडीला जाणाऱ्या रस्त्याला संरक्षक भिंत बांधणे आणि वागदे डंगळवाडी येथे ग्रामस्थांना येण्या-जाण्यासाठी मार्ग तयार करणे. सदर कामांसंदर्भात हायवे प्रशासनाकडून दिलीप बिल्डकॉन कंपनीला सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु, अद्याप सदर कामे सुरू केलेली नाहीत. वरील विषयांचा विचार न झाल्यास टोलनाक्यावर आम्ही तीव्र आंदोलन करू त्यावेळी टोलनाक्यावर काही नुकसानी झाल्यास त्याची जबाबदारी आमची राहणार नाही असा इशारा भाजपाकडून देण्यात आला आहे.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, जिल्हा बँक संचालक प्रज्ञा ढवण, विठ्ठल देसाई, माजी सभापती मनोज रावराणे, नगरसेवक संजय कामतेकर, मेघा गांगण, युवा मोर्चा सरचिटणीस संदीप मेस्त्री, अवधूत तळगावकर, कळसुली उपसरपंच सचिन पारधीये, असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, संतोष चव्हाण, पप्पू पुजारे, समीर प्रभुगावकर, सदा चव्हाण, सुशील सावंत, पप्पू पुजारे, राजन चिके, स्वप्नील चिदरकर, विजय चिदरकर आदी उपस्थित होते.
