जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची माहिती
ओरोस ता.०६-:खावटी कर्ज घेतलेले जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने शेतकरी आहेत. अन्य कर्जदारांप्रमाणे आपले कर्ज माफ होईल, या आशेने त्यांनी खावटी कर्जाची परतफेड केलेली नाही. राज्य शासनाने त्यासाठी कर्जमाफी जाहीर करत अनुदान सुद्धा मंजूर केलेले आहे. परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही. परिणामी हे शेतकरी मुद्दल पेक्षा व्याजाची रक्कम झाल्याने कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे २०१६ नंतर खावटी कर्ज घेतलेले आहे परंतु त्यांचे कर्ज माफ होऊ शकत नाही. अशा शेतकऱ्यांसाठी जिल्हा बँकेने नवीन योजना आणली आहे. या शेतकऱ्यांना जून २०२२ पूर्वी खावटी कर्जातून मुक्त केले जाणार आहे. त्यासाठी त्यांना कमी व्याजाचे शेती कर्ज देणार आहोत, असे जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी सांगितले.
सिंधुदुर्गनगरी येथील सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बँक अध्यक्ष मनीष दळवी बोलत होते. यावेळी पुढे बोलताना दळवी यांनी १ एप्रिल २०१६ नंतर खावटी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी शासन कर्ज माफ करेल, म्हणून कर्ज परतफेड केलेली नाही. परिणामी मूळ रक्कमे पेक्षा व्याजाची रक्कम झाली आहे. या शेतकऱ्यांना या कर्जाच्या फासातून बाहेर काढण्याचे प्रयत्न जिल्हा बँकेने सुरू केले आहेत, असे सांगितले. खावटी कर्ज घेतलेले सात हजार शेतकरी असल्याचेही यावेळी दळवी यांनी सांगितले.
