मालवण (प्रतिनिधी) देशातील प्रत्येक नागरिकावर कर्ज आहे. देशात बिघडलेल्या वातावरणामध्ये फिरताना स्त्रियांच्या मनात भीती आहे. देशातील नागरिकांना महागाईची झळ बसत आहे. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षानंतरही भारतात लोकशाही अस्तित्वात नसल्याचे दिसते, असा आरोप हिंदू जनजागृती समितीचे समन्वयक मनोज खाड्ये यांनी येथे केला.
मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे बुधवारी हिंदू राष्ट्र जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी खाड्ये बोलत होते. दीप प्रज्वलन सद्गुरू सत्यवान कदम यांनी केले. स्वागत चंद्रकांत भोजने व देऊ करलकर यांनी केले. खाड्ये म्हणाले, दहा वर्षांपूर्वी भारताला हिंदू राष्ट्र म्हणायला नागरिक धजावत नव्हते. परंतु आज भारत हिंदू राष्ट्र होण्याच्या दृष्टीने अनुकुलता दिसत आहे. त्यामुळे हिंदूंनी धर्माप्रती असणाऱ्या कर्तव्याचे पालन करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
