मालवण ता.०९-:* मालवण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा धोकादायक बनल्या असून याकडे शिक्षण विभागाने अक्षम्य असे दुर्लक्ष केले आहे. दुरुस्तीसाठी या शाळांचा अंतर्भाव युडीआयएसई मध्ये होणे गरजेचे असताना काही शाळांच्या मुख्याध्यापकव केंद्रप्रमुख यांच्याकडून त्यादृष्टीने कार्यवाही न झाल्याने त्या शाळांचा युडीआयएसई मध्ये समावेश झालेला नाही. शाळांची दुरुस्ती न झाल्याने विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे याला जबाबदार असणार्या संबंधित मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी पंचायत समितीचे गटनेते सुनील घाडीगावकर यांनी मालवण पंचायत समितीच्या मासिक सभेत केली. दरम्यान, सुनील घाडीगांवकर यांच्या या मागणीनुसार गटविकास अधिकार्यांनी संबंधित मुख्याध्यापकांना शोकॉस नोटीस काढण्याचे आदेश गटशिक्षणाधिकारी यांना दिले. मालवण पंचायत समितीची मासिक सभा आज छत्रपती संभाजीराजे सभागृहात सभापती अजिंक्य पाताडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
यावेळी उपसभापती राजू परुळेकर, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, सहायक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, पंचायत समिती गटनेते सुनील घाडीगावकर, कमलाकर गावडे, अशोक बागवे, विनोद आळवे, मनीषा वराडकर, सोनाली कोदे, मधुरा चोपडेकर, गायत्री ठाकूर, निधी मुणगेकर, छाया परब यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सभापतींसह सर्व सदस्यांचा कार्यकाळ येत्या १४ मार्च रोजी संपत असल्याने आज शेवटची मासिक सभा पार पडली. मालवण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा धोकादायक बनल्या असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. या धोकादायक शाळा प्राधान्याने युडीआयएसईमध्ये समाविष्ट करून घेणे गरजेचे असताना ती कार्यवाही का झाली नाही अशी विचारणा सुनील घाडीगावकर यांनी शिक्षण विभागाच्या अधिकार्यांना केली. काही ठराविक शाळांचाच युडीआयएसईमध्ये समावेश झाला असून उर्वरित शाळा यावर्षात न घेतल्याने त्या कोसळल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. धोकादायक शाळांचा समावेश युडीआयएसईमध्ये करण्याची जबाबदारी ही मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांची होती. त्यामुळे संबंधित मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी श्री. घाडीगावकर यांनी केली. त्यानुसार गटविकास अधिकार्यांनी संबंधित मुख्याध्यापकांना शोकॉस नोटीस बजावण्याचे आदेश शिक्षण विभागाच्या अधिकार्यांना दिली.
पोईप ग्रामपंचायतीत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप मागील पंचायत समितीच्या सभेत गटनेते सुनील घाडीगावकर यांनी केला होता. त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीची चौकशी पूर्ण झाली असून त्याबाबतचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे, असे गटविकास अधिकारी श्री. जाधव यांनी सांगितले. कृषी विभागाच्यावतीने दोन लाख रोपांचे वाटप कुठे झाले याची सविस्तर माहिती मागील बैठकीत मागण्यात आली होती. त्यात केवळ तालुक्यात वाटप झालेल्या रोपांची माहिती कृषी विभागाच्यावतीने देण्यात आली. यावर गटनेते घाडीगावकर यांनी या रोपांच्या वितरणात घोटाळा झाला असून जिल्ह्यात कुठे कुठे या रोपांचे वाटप झाले याची यादी सादर करण्याची मागणी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली. त्यानुसार कृषी विभागास सूचना देण्यात आल्या.
कांदळगाव, हडी येथे खारलॅण्ड विभागाच्यावतीने अद्यापपर्यत चिखलफळ्या काढण्याचे काम झालेले नसल्याने सोनाली कोदे यांनी आक्रमक होत याबाबत पंचायत समितीच्या मासिक सभेत ठराव घेऊनही दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्यापपर्यत कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचे सांगितले. संबंधित विभागास सूचना किंवा स्मरणपत्र प्रशासनाकडून का पाठविण्यात आले नाही. चिखलफळ्या न काढल्याने सद्यःस्थितीत या भागातील माडबागायती खार्या पाण्याखाली गेल्या असून या नुकसानीला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित करत सोनाली कोदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ओवळीये वायंगणीवाडी येथील बंधार्याच्या कामाची निविदा २२ टक्के कमी दराने भरण्यात आली असून हे काम एवढ्या कमी दराने होणार का? त्यामुळे या कामाची फेरनिविदा काढण्यात यावी अशी मागणी श्री. घाडीगावकर यांनी केली.
कसाल- राठीवडे, हिवाळे, ओवळीये रस्त्यालगतची झाडी तोडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जेसीबीचा वापर केला जात असल्याने रस्त्याच्या कडेचे डांबर उखडत आहे. रस्ता खराब करून ही कामे करू नयेत, झाडी तोड करणाऱ्या ठेकेदारस बिल देऊ नये अशी मागणी सुनील घाडीगांवकर यांनी केली. चौके येथील धोकादायक झाड न हटविल्याने मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे असे मनीषा वराडकर यांनी निदर्शनास आणून दिले. मात्र हे झाड खूप मोठे असल्याने ते हटविण्यासाठी आवश्यक कटर तसेच होणारा खर्च हा जास्त असल्याने ते सद्यःस्थितीत हटविले नसल्याचे सार्वजनिक बांधकामच्या अधिकार्यांनी स
