.. तर ‘बांधकाम’च्या कार्यालयास टाळे ठोकणार…

मनसेचे दीपक गावडे यांचा इशारा;पिंगुळी रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी

कुडाळ : पिंगुळी-वडगणेश ते माणकादेवी रस्ता दुरुस्ती व डांबरीकरण कामास तात्काळ सुरूवात करून आंगणेवाडी जत्रोत्सवापर्यंत काम पूर्ण न केल्यास सार्वजनिक बांधकाम उपविभाग कुडाळ कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा मनसेचे कुडाळ उपतालुकाध्यक्ष दीपक गावडे यांनी दिला आहे.

याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात गावडे यांनी म्हटले आहे की, पिंगुळी वडगणेश मंदिर ते माणकादेवी या रस्त्यावर काही ठिकाणी खडी टाकून पंधरा ते वीस दिवस झाले असून अद्यपपर्यंत कामाला सुरुवात करण्यात आलेली नाही. कंत्राटदाराने टाकलेली खडी रस्त्यावर येऊन अपघातास कारणीभूत ठरत असून छोटे-मोठे अपघात घडून जीवित हानी झाल्यास त्याची जबाबदारी बांधकाम विभाग घेणार आहे का? हा खरा सवाल आहे. अलीकडेच या रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी वडगणेश मंदिरापासून स्त्याचे काम तात्काळ सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदारास तात्काळ काम करण्याचे आदेश दिलेले होते. मात्र, नुसती खडी टाकून कंत्राटदार काम अडवून सुशेगात फिरत आहे, अशी परिस्थिती आहे. या रस्त्यावरील दैनंदिन वर्दळ पाहता रस्त्यावर येणारी खडी धोकादायक बनली आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने आंगणेवाडी जत्रोत्सवापर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण न केल्यास सार्वजनिक बांधकाम उपविभाग कुडाळ कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा मनसेचे कुडाळ उपतालुकाध्यक्ष दीपक गावडे यांनी दिला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कंत्राटदार यांचे साटेलोटे असल्यानेच रस्त्याची कामे रखडली असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

You cannot copy content of this page