धनगर समाज विचारमंचचा विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न…

वैभववाडी प्रतिनिधी धनगर समाज विचारमंच, सिंधुदुर्ग या संस्थेने सलग सातव्या वर्षी आयोजित केलेला जिल्हास्तरीय विद्यार्थी गुणगौरव सोहळा ग्रामसेवक भवन ओरोस येथे उत्साहात संपन्न झाला. सन २०१९-२० व२०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील १० वी उत्तीर्ण,१२ वी उत्तीर्ण, पदवी प्राप्त, पदव्यूत्तर अभ्यासक्रम, शिष्यवृत्ती गुणवत्ताधारक, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच यावेळी राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांच्यात पुण्यतिथी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय अॉनलाईन वक्तृत्व स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांनाही पारितोषिक वितरण करण्यात आले. धनगर समाज विचारमंच सिंधुदुर्ग या संस्थेमार्फत गेली अनेक वर्षे समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच समाजातील आपद्ग्रस्त कुटुंबानाही संस्थेमार्फत मदतीचा हात दिला जातो. समाजातील मुलांच्या गुणांचे कौतूक व्हावे व त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी सलग ७व्या वर्षी विद्यार्थी पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हयाच्या कानाकोप-यातील सुमारे २०० विद्यार्थ्यांना यावेळी पारितोषिक वितरित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर पोलिस उपनिरिक्षक बापू खरात, सहाय्यक पोलिस उपनारिक्षक नवलू कोकरे, नायब तहसिलदार गंगाराम कोकरे, साटेली भेडशी सरपंच लखू खरवत, विस्तार अधिकारी महादेव खरात, नरेश खरात, दशरथ शिंगारे, शिवाजी जंगले, नवलराज काळे, पांडूरंग काळे, स्वप्नाली शेळके, जनार्दन शेळके,संतोष गुरखे, जनार्दन पाटील, लक्ष्मण पाटील,धाकू झोरे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी मनोगतातून यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. दुर्गम भाग व डोंगर द-यात राहणा-या समाजातील मुलांचे यशाचे मूल्य हे शहरी भागातील मुलांच्या यशाच्या तुलनेत खूप मोठे असते. कारण दुर्गम भागातील मुलांना पुरेशा भौतिक सुविधा नसतात. तरीही आपण सर्वांनी उज्वल यशापर्यंत झेप घेतली आहे. त्यामुळेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या पाठीवर कौतूकाची थाप देण्याचे काम धनगर समाज विचारमंच ही संस्था करत आहे. हे कौतूक आपला उत्साह वाढविण्यासाठी आणि यशाची नवी क्षितीजे शोधण्यासाठी आहे. असे उद्दगार कार्यक्रमाचे अध्यक्ष आर.डी.जंगले यांनी मनोगतातून व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. धनगर समाज विचारमंच ही संस्था गेली सात वर्षे विविध उपक्रम राबवत आहे. कड्याकपारीत राहून पायपीट करत शिक्षण घेणा-या मुलांना प्रोत्साहन देण्याचे काम ही संस्था करत आहे. संस्थेचे कार्य भावी पाढीला दिशा देणारे आहे. असे गौरोवोद्गार पोलिस उपनिरीक्षक बापू खरात यांनी काढले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवू जंगले यांनी केले सूत्रसंचालन सचिव एकनाथ जानकर व आभार रामचंद्र झोरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका संघटक व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

You cannot copy content of this page