उद्योगमंत्री उदय सामंत यांची मिश्किल टिपणी; संजू च्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमी जिल्ह्यात सर्व काही चांगलं घडत आहे..
सावंतवाडी । प्रतिनिधी :
“संजू परब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वच वक्ते मन मोकळे करून बोलले. त्यामुळे त्यांचा वाढदिवस दर तीन महिन्यांनी यावा असे वाटते,” अशी मिश्किल टिपणी करत, “पक्षाशी व नेत्यांशी सदैव प्रामाणिक राहणाऱ्या संजू परब यांच्या चेहऱ्यावर नेहमी हासू कायम राहावे,” अशा शब्दांत उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
संजू परब हा जरी निलेश राणे यांचा मित्र असला, तरी तो आमदार दीपक केसरकर यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करत आहे आणि दिलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पूर्ण करतो, असे सांगतानाच लवकरच दत्ता सामंत यांच्यावरही मोठी जबाबदारी सोपवली जाईल, असे संकेत सामंत यांनी दिले.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी पक्षभेद सोडून एकत्र येण्याचे आवाहन करत ते म्हणाले, “संजूच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वकाही चांगले घडत आहे. काल ‘ताज’चा सामंजस्य करार (MoU) झाला, तर आज दीपकभाईंमुळे मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटलचा मार्ग मोकळा होऊन त्यांचे स्वप्न साकार होत आहे. निलेश राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मंत्र घेतल्याने ते अभ्यासपूर्ण भाषणातून विधानसभा गाजवत आहेत. त्यांचा आदर्श घेऊन संजू काम करत असून वरिष्ठ नक्कीच कार्यकर्त्यांच्या कामाची दखल घेतात.”
राणे कुटुंबावर टीका झाल्यावर प्रथम उत्तर देणारा संजूच होता, असे नमूद करत सामंत यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. “केवळ ८० टक्के नव्हे, तर १०० टक्के समाजकारण करा. सत्ताकेंद्रांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना विकास मिळवून द्या आणि शासनाच्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचवा. पोषण आहाराची केंद्रे चकाचक करण्याचा संकल्प या वाढदिवशी करावा आणि संजूने असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत की पुढच्या वाढदिवसाला याहून मोठे सभागृह घ्यावे लागेल. आडाळी एमआयडीसीत सोलर प्लांटसह अनेक उद्योग येत असून गरज पडल्यास तिचे विस्तारीकरणही करू,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
