*अँड. मनिष सातार्डेकर यांचा आरोप
*💫वेंगुर्ला दि.२४-:* वेंगुर्ला शहरात सध्या भुमिगत विजवाहिनी घालण्याचे काम सुरु असून सदरचे काम हे ठेकेदार अनागोंदी करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अॅड. मनिष सातार्डेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. अॅड.सातार्डेकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, शहरात सध्या भुमिगत विजवाहिनी घालण्याचे काम सुरु असून त्यासाठी शहरातील सर्वच रस्ते खोदण्यात आले आहेत. सदरचे खोदकाम करताना वाहतुकीसाठी लागणारे कोणतेच नियोजन ठेकेदाराने तथा संबंधित प्रशासनाने केलेले नाही. तसेच ठेकेदार आपल्या मनमानीप्रमाणे रस्त्यांची खोदाई करत असून सदर खोदाईच्यावेळी लागणारे वाहतूकीचे नियोजन नसल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्याचा प्रचंड त्रास वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना होत आहे. ठिकठिकाणी रस्ते खोदून मातीचे ढिगारे करुन ठेवल्याने त्याचाही त्रास शहरातील नागरीकांना होत असून सर्वत्र धूळीचे साम्राज्य पसरले आहे. या धूळीमुळे आरोग्याचा त्रास निर्माण होऊ शकतो. माती रस्त्यावर टाकल्याने वाहने घसरुन छोटे-मोठे अपघात देखील होत असून एखादा मोठा अपघात झाल्यास त्यास केवळ संबंधित ठेकेदार तसेच संबंधित प्रशासकीय अधिकारी व वेंगुर्ला नगरपरिषद जबाबदार असेल. त्यामुळे संबंधित ठेकेदार तसेच संबंधित प्रशासन व वेंगुर्ला नगरपरिषद यांनी वाहतुकीचे योग्यरित्या नियोजन करुन तसेच वर नमुद बाबींची योग्य ती काळजी घेऊन मगच रस्ते खोदाईचे काम करावे अन्यथा त्यांचे गंभीर परिणाम संबंधितांना भोगावे लागतील असा इशाराही अॅड. सातार्डेकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिला आहे.
