एडगाव वासियानी आपल्या भावना व्यक्त करत वाहिली पुंडलिक रावराणे यांना आदरांजली
वैभववाडी प्रतिनिधी गावात राजकारण न करता समाजकारण करत पुंडलिक उर्फ नाना रावराणे यांनी तब्बल 25 वर्षे सरपंच पद सांभाळले होते. नानांना शेतीमध्ये प्रचंड आवड होती. वडिलोपार्जित शेती सांभाळून प्रत्येकाने इतर गोष्टी कडे लक्ष दिले पाहिजे. असा सल्ला नाना नेहमी प्रत्येकाला देत असत. नाना स्वच्छतेचे दूत होते. समाजकारण व राजकारण करतांना त्यांनी नेहमी महिलांचा आदर केला. त्या काळात येणार्या तुटपुंजा निधीत नानांनी शासनाच्या योजना गावात प्रभावीपणे राबविल्या. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी नानांचा आदर्श प्रत्येकाने घेतला पाहिजे. गावचा आधारस्तंभ, विकासपुरुष काळाच्या पडद्याआड गेला. अशा भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या. एडगांवचे माजी सरपंच पुंडलिक उर्फ नाना रावराणे यांचे वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी एडगांव ग्रामपंचायत सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभापती अक्षता डाफळे, भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी, माजी सभापती जयेंद्र रावराणे, एडगांव सरपंच श्रीमती तांबे, बाळा हरयाण, महेश संसारे, प्राचार्य सी. एस. काकडे, सज्जनकाका रावराणे, सुनील रावराणे, राजेंद्र राणे, स्नेहलता चोरगे, बाबा कोकाटे, उत्तम सुतार, राजेंद्र सुतार, हुसेन लांजेकर, विलास देसाई, प्रदीप नारकर, रवींद्र रावराणे, ग्रामसेवक उमेश राठोड, राजू पवार, सचिन रावराणे, आप्पा रावराणे, संजय सावंत, रत्नाकर कदम, बाप्पी मांजरेकर, स्नेहल रावराणे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नानाराव यांनी तब्बल पंचवीस वर्ष बिनविरोध सरपंच पद सांभाळले, तालुक्याच्या सहकारात त्यांनी मोठे योगदान दिले. पण त्यांनी पदाचा बडेजाव कधी केला नाही. शासनाच्या योजना त्यांनी गावात त्याकाळात पारदर्शकपणे राबविल्या. शेतीची त्यांना प्रचंड आवड होती. शेतीच्या कामात ते माहिर होते. त्यांनी बासमती भाताच्या शेतीचा प्रयोग तालुक्यात केला. शेतकऱ्यांमध्ये स्फुरण निर्माण करणाऱ्यापैकी नाना होते. दोन गावातील शेतकरी एकत्र करून उसाचे फड निर्माण करण्याचा प्रयत्न नानांनी केला होता. शेतीतले परिपूर्ण मित्र त्यांनी गोळा केले होते. अशा अनेक आठवणींना मान्यवरांनी उजाळा दिला. नानांकडे जातीभेदाला थारा नव्हता. बहुजन समाजासाठी नाना आधारस्तंभ होते. त्यांच्या जाण्याने समाजाची हानी झाली आहे. नाना उतारवयात गाव कसा चालला आहे असे कायम कानोसा घेत राहिले. गाव अजून विकासात पुढे नेण्यासाठी नानांचा आदर्श हा प्रत्येकाने घेतला पाहिजे. या शोकसभेला जवळपास तीनशे ग्रामस्थ उपस्थित होते. एडगांव गावातील प्रत्येक वाडीतील ग्रामस्थ नानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित झाले होते. रवळनाथ सेवा सोसायटीच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्नेहल रावराणे, आभार जयेंद्र रावराणे यांनी मानले.
