गिरणी कामगारांचा हक्काचा माणूस गेला

दिलीप कुडाळकर यांच्या निधनाने गिरणी कामगार पोरके झाले

वैभववाडी प्रतिनिधी गिरणी कामगारांना मुंबईतच हक्काची घरे मिळवून देण्यासाठी लढणारे लढाऊ नेते दिलीप कृष्णाजी कुडाळकर (वय ४७) यांचे आज मुंबईतील एका खाजगी रूग्णालयात अल्पशा (कोरोना) आजाराने सकाळी निधन झाले. मुळ तिथवली, ता. वैभववाडी येथील मुळ गावी ते गेले काही दिवस पत्नी व मुलासह ते राहत होते. हरितालिका दिवशी त्यांनी कोरोनाची पहिली लसही वैभववाडीत सहपरिवार घेतली होती. मात्र गणेशोत्सवाच्या नंतर त्यांचा कोरोना अहवाल सकारात्मक आला होता. ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. अधिक उपचारासाठी त्यांना भावांनी मुंबईतील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. प्रकृती सुधारत असताना आज सकाळी त्यांचे दु:खद निधन झाले. गिरणी कामगारांच्या लढ्यात ते प्रथम गिरणी कामगार कर्मचारी निवारा आणि कल्याणकारी संघाचे सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस म्हणून जिल्हाध्यक्ष भाई चव्हाण यांच्या सोबत बरीच वर्षें कार्यरत होते. गेल्या सहा वर्षांत ते गिरणी कामगार वारस उत्कर्ष सेवा संघाचे विश्वस्त आणि सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा, दोन भाऊ, भावजया, पुतणे, एक बहिण असा परिवार आहे. कोकण रेल्वेतील अधिकारी दिपक कुडाळकर यांचे ते धाकटे भाऊ होते. अलीकडे त्यांच्या आईचे वार्धक्याने निधन झाले होते.

You cannot copy content of this page