दळवी महाविद्यालयाच्या ‘फ्रुट-फुल वे टू बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट’ उपक्रमाचा कुलगुरूंच्या हस्ते वृक्षारोपणाने शुभारंभ
*💫कणकवली दि.१०-:* तळेरे येथील मुंबई विद्यापीठाच्या दळवी महाविद्यालयात ‘फ्रुट-फुल वे टू बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट २० -२१’ या कार्यक्रमाचे उदघाटन मुंबई विद्यापीठ कुलगुरू प्रा. डॉ. सुहास पेडणेकर यांच्या हस्ते झाले .यावेळी प्रा. डॉ. सुहास पेडणेकर म्हणाले, “दळवी महाविद्यालयाच्या या उपक्रमाने पर्यावरणाचे रक्षण होईल. लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू होणार असून त्या ठिकाणी स्थानिक व्यवसायावर आधारित शिक्षण दिले जाणार आहे व त्यासाठी श्री.श्रीपाद वेलिंग ह्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे स्थानिकांना उद्योजक होण्यासाठीची संधी प्राप्त होणार आहे”. यावेळी कर्नल नरेश कुमार (कमांडिंग ऑफिसर, ५८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी), धनेश सावंत (सिनेट मेंबर, मुंबई विद्यापीठ), डॉ. दिलीप भारमल (प्राचार्य, एसपीके कॉलेज, सावंतवाडी), विनोद पाटील (अभियंता, मुंबई विद्यापीठ), श्रीपाद वेलिंग (संचालक, सिंधुदुर्ग उपकेंद्र,मुंबई विद्यापीठ) हे उपस्थित होते. मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील काम चालू असताना बरीच झाडे तोडली गेली, नवीन झाडांचे संवर्धन, आवश्यक असल्याचे सिनेट सदस्य धनेश सावंत म्हणाले. दळवी महाविद्यालयात नेहमीच नावीन्यपूर्ण समाज उपयोगी उपक्रम राबविले जातात. कोकण विकासाचा ध्यास मनी बाळगून त्यास प्रत्यक्ष कृतीत उतरवणारे विनायक दळवी यांनी ‘फ्रूट-फुल वे टू बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट’ ही संकल्पना १४ जुलै २०१९ रोजी अस्तित्वात आणली. “पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून रस्त्याच्या दुतर्फा फळझाडे लावली तर वाटसरूंना सावली व फळे मिळतील. फळझाडांनी लगडलेला महामार्ग म्हणून भविष्यात जगाचे आकर्षण ठरू शकणारा हा रस्ता आपणांस वर्ल्ड हेरिटेज बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट असलेल्या सह्याद्रीची वाट दाखवेल.” अशी आभासी प्रस्तावना त्यांनी केली. मागील दोन वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. २०१९ मध्ये तळेरे गावच्या सरपंच, श्रीमती साक्षी सुर्वे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. गेल्यावर्षी माजी सभापती दिलीप तळेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तर या वर्षी कुलगुरू प्रा. डॉ. सुहास पेडणेकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या उपक्रमाची व्याप्ती या वर्षापासून वाढणार आहे. मुंबई विद्यापीठाचे एनएसएस विभाग प्रमुख प्रा. सुधीर पुराणिक हा उपक्रम पुढे घेवून जाणार असून एनएसएस विभागाद्वारे संपूर्ण महामार्गावर तो राबविला जाईल असे कुलगुरू म्हणाले.महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रोपे देण्याचा मानस व्यक्त केला आहे. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलित करुन झाली. विनायक दळवी यांनी शब्दबद्ध केलेले महाविद्यालय गीत ओंकार बर्वे यांनी गायिले. श्रीपाद वेलिंग यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. कु. साक्षी भोगटे हिने महाविद्यालय विकास गाथा पीपीटी द्वारे दाखवली. कु.अर्चना हिवाळकर हिने कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विनायक दळवी यांचा अल्प परिचय करून दिला. कु. सायली महाजन कर्नल नरेश कुमार यांची ओळख करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक नरेश शेटये यांनी पालकमंत्री मा. उदयजी सामंत ह्यांच्या निसर्ग सजगतेच्या व स्वयंस्फूर्त सहकार्याचा विशेष उल्लेख केला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हेमंत महाडीक यांनी चेतन नेमण,नितीश गुरव व शिक्षक व शिक्षकेत्तर वर्ग यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
