गुजरातमध्ये तात्काळ पाहणी करणाऱ्या पंतप्रधानांकडून महाराष्ट्रात ‘ती’ तत्परता नाही;आ वैभव नाईक यांचा आरोप
*💫कणकवली ०७-:* तौक्ते चक्रीवादळ येऊन तब्बल २२ दिवस उलटले आणि आता केंद्रीय समितीचे पथक सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहणीसाठी दाखल झाले आहे. मात्र गुजरातमध्ये वादळ धडकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तातडीने पाहणी दौरा करून एक हजार कोटींचे आर्थिक पँकेज जाहीर केले होते. महाराष्ट्र राज्यात मात्र केंद्राकडून ही तत्परता दाखवण्यात आली नाही. महाराष्ट्र राज्याला मदत न करता केंद्रीय समितीच्या पथकाने केवळ पाहणी दौरा करून नुकसानग्रस्त कोकणी जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. असा टोला आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे. नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर राज्यांना मदत करणे हे केंद्र सरकारचे कर्तव्यच असते. महाराष्ट्रात भाजपची सत्ता नाही म्हणून केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्र राज्याच्या बाबतीत दुजाभाव करत आहे. तौक्ते चक्रीवादळाच्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी राज्य सरकारने नवीन नियमांनुसार जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले असून यासाठी आवश्यक निधीची तरतूद देखील करण्यात आली आहे. त्याची कार्यवाही पूर्णत्वास नेली जात असून दोन दिवसांनी प्रत्यक्षात नुकसानग्रस्तांना मदत दिली जाणार आहे. याबद्दल केंद्रीय समितीने राज्य सरकारचे कौतुक करणे अपेक्षित होते. मात्र केंद्रीय समितीने जिल्हा प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली. जिल्ह्यात झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी आलेले विरोधी पक्षनेते व जिल्ह्यातील भाजपचे खासदार यांनी आपले वजन वापरून राज्याला केंद्राकडून मदत मिळवून देणे अपेक्षित आहे. मात्र केंद्रीय समितीने तब्बल २२ दिवसांनी सिंधुदुर्गमध्ये येऊन केवळ पाहणीच केली त्यामुळे जिल्ह्यातील भाजपचे खासदार नारायण राणे व स्वयंघोषित भाजपनेते यांचे केंद्रात किती वजन आहे, हे यानिमित्ताने आपल्याला दिसून येते. केंद्रीय पथकाच्या पाहणी दौऱ्यात राणेंना स्थान दिले जात नाही यावरून केंद्रातील भाजप सरकारमध्ये त्यांची किती केविलवाणी अवस्था झाली आहे हे एव्हाना जिल्हावासीयांना कळून चुकले आहे. कोकणवासीयांवर भाजपचे किती प्रेम आहे हे देखील यातून दिसते. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी आपली पात्रता ओळखावी, असा टोला आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे.
