मालवण (प्रतिनिधी)
कुडोपी गाव व परिसरात सुरू असलेल्या लाल दगडाच्या उत्खननामुळे नैसर्गिक झरे, विहिरी तसेच अन्य जलस्रोत बाधित होऊन पाणी दूषित होत असल्याने सदर चिरे खाण बंद करावी या मागणीसाठी आज कुडोपी ग्रामस्थांनी मालवण तहसील कार्यालयासमोर आंदोलन छेडले. यावेळी ग्रामस्थांनी आपल्या मागण्या तहसीलदार गणेश लव्हे यांच्याकडे मांडल्यानंतर तहसीलदार श्री. लव्हे यांनी सदर खाणी बाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांचा अहवाल घेतल्यावर तसेच खाणमालकाचे म्हणणे दाखल करून घेतल्यावर खाण कायमस्वरूपी बंद करण्याबाबत निर्णय घेता येईल, असे आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी आंदोलन स्थगित केले.
कुडोपी गावातील चिरेखाण बंद करावी या मागणी साठी आज सकाळी दहा वाजल्यापासून कुडोपी ग्रामस्थानी मालवण तहसील कार्यालयासमोर ठाण मांडत आंदोलन छेडले. यावेळी सरपंच संतोष पाणवलकर, सदस्य प्रशांत पडवळ, सदस्य गुरुप्रसाद मयेकर, ग्रामस्थ बाळकृष्ण पडवळ, हेमंत पडवळ, दिव्या पडवळ, समीर हिर्लेकर, भास्कर पडवळ, अक्षय घाडी, दिनेश वाळवे, दत्ताराम वाळवे, राजेंद्र वाळवे, शशिकांत वाळवे, गणेश वाळवे, गुरूदास घाडी आदी उपस्थित होते.
सायंकाळी तहसीलदार गणेश लव्हे यांच्याशी झालेल्या चर्चेत ग्रामस्थांनी आपली भूमिका मांडली. कुडोपी गाव व परिसरात मोठ्या प्रमाणात लाल दगडाचे उत्खनन सुरू आहे. या उत्खननामुळे परिसरातील नैसर्गिक झरे, विहिरी आणि इतर जलस्रोतांवर विपरीत परिणाम होत असून पर्यावरणाचेही नुकसान होत आहे. गावाला पाणीपुरवठा करणारे नैसर्गिक झरे आणि जलस्रोत ग्रामस्थांसाठी जीवनदायी आहेत. मात्र उत्खननामुळे या जलस्रोतांचे पाणी दूषित होत असल्याने त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
खाणीतील मातीमिश्रित पाणी वाहून नैसर्गिक जलस्रोतांमध्ये मिसळत असल्याने पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता खालावत असून ग्रामस्थ सातत्याने आजारी पडत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तसेच खाणीवर काम करणारे कामगार उघड्यावर शौचास बसत असल्याने पावसाळ्यात ही घाण वाहून जलस्रोतांमध्ये मिसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तसेच सदर खाणीमुळे गावातील पुरातन कातळशिल्पांना देखील धोका पोहचू शकतो. गावातील पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता, सार्वजनिक आरोग्य, पर्यावरणाचे संरक्षण आणि नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन हा अत्यंत गंभीर विषय आहे. त्यामुळे प्रशासनाने सदर चिरेखाण बंद करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
या चर्चेनंतर तहसीलदार गणेश लव्हे यांनी ग्रामस्थांना लेखी पत्र देऊन कार्यवाहीबाबत आश्वासित केले. सदर चिरेखाण परिसराचा स्थळ पाहणी अहवाल प्राप्त झाला असून उत्खननाच्या ठिकाणी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक व सुरक्षिततेच्या उपाययोजना तात्काळ कराव्यात, नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण व सार्वजनिक गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, खाण परवान्यातील अटी व शर्ती यांचे काटेकोरपणे पालन करावे अशा सूचना खाण मालकास देण्यात आल्या आहेत. तसेच सदर खाणीच्या परवान्याबाबत प्रांतधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली असून खाणी मधून येणाऱ्या पाण्यामुळे व उघड्यावर शौचामुळे दूषित होणाऱ्या पाण्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांचा अहवाल घेतल्यावर तसेच खाणमालकाचे म्हणणे दाखल करून घेतल्यावर खाण कायमस्वरूपी बंद करण्याबाबत निर्णय घेता येईल, असे आश्वासन तहसीलदार श्री. लव्हे यांनी दिल्याने ग्रामस्थांनी आंदोलन स्थगित केले.
