मळगाव ग्रामस्थांचा पुन्हा आंदोलनाचा इशारा…
⚡सावंतवाडी ता.०७-: मळगाव ग्रामपंचायतीकडे १४ व्या व १५ व्या वित्त आयोग तसेच ग्रामनिधी अंतर्गत सुमारे ₹१ कोटी ७० लाखांचा अखर्चित विकास निधी उपलब्ध असून तो गावाच्या विकासकामांवर खर्च करण्यासाठी तातडीने खास ग्रामसभा बोलविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत प्रशासनाकडे लेखी निवेदनही सादर करण्यात आले आहे.
ग्रामस्थांच्या निवेदनानुसार, अखर्चित निधी दीर्घकाळ खर्च न झाल्याने अनेक विकासकामे रखडली असून त्यावर चर्चा करून ठराव मंजूर करण्यासाठी विशेष ग्रामसभा घेणे आवश्यक आहे. तसेच विद्यमान प्रशासक (माजी उपसरपंच) यांनी यापूर्वी झालेल्या ग्रामसभेत, “अखर्चित निधी खर्च करण्यासाठी सक्षम प्रशासक नेमण्यासाठी माझा राजीनामा आवश्यक असेल तर त्यासाठी खास ग्रामसभा घेऊन ठराव करा,” असे सूचित केल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.
याच पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी खास ग्रामसभा घेण्याची अधिकृत मागणी केली आहे. मात्र, त्यानंतर २५ जून २०२६ रोजी प्रशासकीय सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत खास ग्रामसभेच्या मागणीचा विषय चर्चेस येणार होता. परंतु, प्रभारी सरपंच (प्रशासक) हनुमान पेडणेकर अनुपस्थित असल्यामुळे ही सभा रद्द करण्यात आली, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.
यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, लोकांच्या समस्या, अर्ज आणि दाखल्यांवर निर्णय घेण्यासाठीच सभा होत नसतील तर अशा प्रशासकीय व्यवस्थेचा गावाला काय उपयोग, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, खास ग्रामसभा तातडीने आयोजित करून अखर्चित विकास निधीबाबत निर्णय न घेतल्यास पुन्हा एकदा ग्रामपंचायत कार्यालयावर टाळ ठोक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी प्रभारी प्रशासक (सरपंच) यांच्यावर राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
