ग्रामस्थांचा सवाल: लवकरात लवकर बुजवण्याची होत आहे मागणी..
⚡सावंतवाडी ता.१२-: मळेवाड येथील “तो” खड्डा बुजणार तरी कधी? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी ,वाहनधारकांनी केला असून,या मोठ्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचून एखादी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.त्यामुळे हा खड्डा लवकरात लवकर बुजवण्याची मागणी आता होत आहे.
सावंतवाडी ते मळेवाड या मुख्य रस्त्यावरील मळेवाड येथील श्री गजानन महाराज मंदिरासमोरील मुख्य रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून एक मोठा आणि धोकादायक खड्डा पडला आहे. या खड्ड्यामुळे दररोज लहान-मोठे अपघात घडत असून, “हा खड्डा बुजणार तरी कधी?” असा संतप्त सवाल आता स्थानिक ग्रामस्थ आणि वाहनधारकांकडून विचारला जात आहे. हा रस्ता या भागातील प्रमुख आणि वर्दळीचा मार्ग म्हणून ओळखला जातो. श्री गजानन महाराज मंदिराच्या अगदी समोरच हा खड्डा असल्याने दर्शनासाठी येणारे भाविक, पादचारी आणि दुचाकी चालक ,वाहनधारक यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावरील अंधारामुळे या खड्ड्याचा अंदाज येत नाही, यामुळे अनेक दुचाकीस्वारांना याचा फटका बसला आहे. मात्र, या गंभीर समस्येकडे संबंधित विभागाने प्रशासनाने जाणीवपूर्वक डोळेझाक केली असल्याचा आरोप ग्रामस्थ ,वाहनचालक यांनी केला आहे.गखड्ड्यात केवळ खडी किंवा माती न टाकता त्याचे योग्य पद्धतीने डांबरीकरण करून रस्ता पूर्ववत करावा.एखादा मोठा अपघात घडल्यास त्याला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असेल, असा इशारा ही यावेळी ग्रामस्थांनी दिला आहे.
