सतीश आचरेकर यांनी व्यक्त केले मत..
⚡मालवण ता.०२-:
जिल्ह्यात वाढत असलेल्या अवैध धंद्यांना आळा घालण्यास पोलीस प्रशासन कमी पडत असून या अवैध धंद्यांमुळे समाजाची घडी विस्कटत आहे, या पार्श्वभूमीवर एक जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून आमदार नीलेश राणे यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत या अवैध धंद्यांबाबत व्यक्त केलेली भूमिका ही जनतेच्या भावना मांडणारी आणि समाजहिताचा विचार करणारी असल्याची भावना अनेक स्तरांतून व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील सामाजिक परिस्थिती, युवकांचे भवितव्य आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर त्यांनी केलेले भाष्य अत्यंत महत्त्वाचे आणि विचार करायला लावणारे आहे, असे मत मालवण मधील पर्यटन व मत्स्यव्यावसायिक सतीश आचरेकर यांनी व्यक्त केले आहे.
गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात विविध प्रकारच्या अवैध धंद्यांचे प्रमाण वाढत असल्याबाबत नागरिकांकडून सातत्याने चिंता व्यक्त होत आहे. दारू, जुगार आणि इतर बेकायदेशीर प्रकारांमुळे अनेक युवक चुकीच्या मार्गाकडे वळत असून व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत चालल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम कुटुंबव्यवस्था, सामाजिक वातावरण आणि युवकांच्या भविष्यावर होत असल्याने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आम. निलेश राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सिंधुदुर्ग पोलीस दलातील काही घटकांकडून कथितपणे हफ्ते घेतले जात असल्याचा गंभीर आरोप केला. अवैध धंद्यांना काही स्तरांवरून संरक्षण मिळत असल्याचाही दावा त्यांनी केला. यासंदर्भात काही नावेही पत्रकार परिषदेत मांडली. सखोल चौकशी होऊन सत्य जनतेसमोर यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. या पत्रकार परिषदेवरून आम. निलेश राणे हे एक जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून जिल्ह्यातील या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, हे दिसून येते, असे सतीश आचरेकर यांनी म्हटले आहे.
सतीश आचरेकर पुढे म्हणाले की, समाजात वाढत असलेल्या या समस्यांवर वेळेत नियंत्रण मिळविले नाही तर भविष्यात परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई व्हावी, कायदा आणि सुव्यवस्थेची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे व्हावी आणि युवकांना सुरक्षित, सकारात्मक बातावरण मिळावे, हीच समाजाची अपेक्षा आहे. पत्रकार परिषदेद्वारे त्यांनी मांडलेले मुद्दे हे केवळ राजकीय नसून सामाजिक जबाबदारीतून व्यक्त केलेले असल्याचे अनेकांनी नमूद केले आहे. कुडाळ-मालवण मतदारसंघाच्या विकासाबाबत बोलताना, गेल्या दहा वर्षांत अनेक क्षेत्रांत अपेक्षित गतीने विकास झाला नसल्याची भावना नागरिकांमध्ये होती. पायाभूत सुविधा, रोजगार, पर्यटन, शिक्षण आणि विविध विकासकामांच्या बाबतीत निर्माण झालेला बॅकलॉ ग भरून काढण्याचे मोठे आव्हान होते. मात्र, आमदार नीलेश राणे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर विविध विकासकामांना गती मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे. मतदारसंघातील रस्ते, पर्यटनवाढ, स्थानिक प्रश्न, युवकांसाठी संधी आणि विकासकामांच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांचा अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. विकास आणि समाजहित या दोन्ही मुद्यांना प्राधान्य देत काम करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही श्री. आचरेकर म्हणाले.
समाजातील वाढत्या समस्यांविरोधात स्पष्ट भूमिका घेणे, युवकांच्या भवितव्याचा विचार करणे आणि विकासाच्या मुद्यांवर सातत्याने आवाज उठवणे, ही लोकप्रतिनिधी म्हणून असलेली जबाबदारी आमदार नीलेश राणे योग्य प्रकारे हाताळत आहेत. कुडाळ-मालवण मतदारसंघातील जनतेने योग्य नेतृत्वाच्या हातात सत्ता दिल्यामुळे आमदार नीलेश राणे यांच्या रूपाने सडेतोड, स्पष्टवक्ते आणि जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणारे नेतृत्व मतदारसंघाला लाभल्याची भावना अनेक नागरिक व्यक्त करत आहेत.
