आरोस ग्रामस्थ रस्ताबाबत आक्रमक…

रस्ता दुरूस्ती न झाल्यास दिला आंदोलनाचा इशारा..

⚡सावंतवाडी ता.२४-: आरोस ग्रामपंचायत रस्ता ते दांडेली मुख्य रस्ता बाबत आरोस ग्रामस्थ आक्रमक झाले असून,रस्ता दुरूस्ती न झाल्यास संबंधित विभाग व ठेकेदार यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की,आरोस ग्रामपंचायत ते दांडेली मुख्य रस्ता ( ग्रामा.३८६) मजबुतीकरण करणे हे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सन १०१५- १६ मध्ये पुर्ण झालेले होते. मात्र सद्यस्थितीत सदर रस्त्याची पुर्णपणे चाळण झालेली आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडून डांबरीकरण पूर्णपणे उखडले असून सदरील रस्ता हा धोकादायक बनला आहे.पावसाळ्यामध्ये या खड्ड्यांत पाणी साचून अपघातांचे प्रमाण वाढण्याची दाट शक्यता आहे, रस्त्याच्या दुरावस्थेमुळे एसटी बस तसेच अन्य वाहने गावात येण्यास टाळाटाळ करत आहेत.
या रस्त्याच्या अत्यंत खराब स्थितीबाबत व रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वारंवार येथील ग्रामस्थांनी,ग्रामपंचायतने लेखी अर्ज, विनंत्या आणि पाठपुरावा केला होता मात्र, संबंधित कार्यालयाकडून अद्याप यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.प्रत्येक वेळी कार्यालयाकडून “आज-उद्या काम करू, लवकरच सुरू होईल” अशी केवळ तोंडी आश्वासने देण्यात आली. सध्या या रस्त्याची अवस्था इतकी भयानक झाली आहे की, येथे कोणत्याही क्षणी मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे.
त्यामुळे आरोस गावातील ग्रामस्थांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे, लोकांचा संयम आता संपला असून, ग्रामस्थ अत्यंत आक्रमक झालेले दिसत आहेत. दुरुस्तीचे काम प्रत्यक्ष सुरू झाले नाही तर आरोस गावातील सर्व ग्रामस्थ मिळून आंदोलन करणार असल्याचे सांगितले. तसेच रस्त्याबाबत , संबंधित ठेकेदारास सांगुन रस्त्याची देखभाल दुरुस्ती लवकरात लवकर करुन घ्यावी जेणेकरुन ग्रामस्थांवर आंदोलन करण्याची वेळ येऊ नये .अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे .

You cannot copy content of this page