⚡मालवण ता.२३-:
मालवण दांडी किनाऱ्यावरील श्रीकृष्ण मंदिर ते मोरेश्वर या बंधाऱ्यासाठी माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर होऊन देखील तसेच प्रथम टप्प्यातील बंधाऱ्याच्या कामासाठी वर्कऑर्डर दिली गेली असतानाही राज्यातील सत्तांतरानंतर दोन वर्षे होऊन देखील सत्ताधाऱ्यांकडून या बंधाऱ्याच्या कामास सुरुवात करण्यात आली नसल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण उपशहरप्रमुख हेमंत मोंडकर यांनी दांडी येथील श्रीकृष्ण मंदिरालगत किनाऱ्यावर आज सकाळपासून आमरण उपोषण सुरु केले. बंधाऱ्याच्या कामाबाबत ठोस असे आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहिल, असे यावेळी उबाठा शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी सांगितले.
उबाठा शिवसेनेचे उपशहरप्रमुख यांनी आज सकाळी दहा वाजल्यापासून उबाठा शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आमरण उपोषण छेडले. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, उमेश मांजरेकर, भाई ढोके, रश्मीन रोगे, अन्वय प्रभू, निलेश दुधवडकर, सुजन सागवेकर, आऊ मोंडकर, दाजी रोगे, माधुरी प्रभू आदी व इतर उपस्थित होते. यावेळी पतन विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन चर्चा केली.
यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर म्हणाले, माजी आमदार वैभव नाईक यांच्या कार्यकाळात नाईक यांच्या प्रयत्नातून दांडी येथील श्रीकृष्ण मंदिर ते मोरेश्वर या किनाऱ्यावरील बंधाऱ्यासाठी प्रथम दीड कोटीचा व त्यानंतर दोन कोटीचा निधी तसेच आपत्ती व्यवस्थापन मधून १० कोटीचा निधी असा एकूण सुमारे १४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. या बंधाऱ्याच्या पहिल्या टप्प्यातील दीड कोटीच्या कामाला वर्क ऑर्डरही मिळाली. त्यावेळी येथे दगड टाकून आम्ही कामाचे उदघाटनही केले. मात्र बंधाऱ्यावर सिमेंट काँक्रीटीकरण करावे, अशी स्थानिक नागरिकांची मागणी असल्याने त्यासाठी जिल्हा नियोजनमधून ४० लाखाचा निधीही मंजूर केला होता. मात्र निधी मंजूर असूनही प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हे काम अद्याप सुरु झालेले नाही. राज्यात सत्तांतर होऊन दोन वर्षे झाली तरीही विद्यमान सरकारच्या उदासीनतेमुळे हे काम रखडले आहे. शासनाकडून या कामाची कोणतीही दखल घेतली गेलेली नाही, बंधाऱ्याचे काम न झाल्याने येथील नागरिकांना पावसाळ्यात सागरी लाटांचा मारा सहन करावा लागत आहे, बंधारा कम रस्ता न झाल्याने येथून मत्स्य वाहतूक, व ऍम्ब्यूलन्स सुविधा यापासून नागरिक वंचित राहत आहेत, असेही यावेळी हरी खोबरेकर म्हणाले.
या बंधाऱ्यातील पुढील दहा कोटीच्या बंधाऱ्यासाठी सीआरझेडची परवानगी मिळालेली नाही, ती परवानगी मिळवून देण्यासाठी देखील सरकारच्या येथील प्रतिनिधीकडून कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत. पहिल्या टप्प्यातील दीड कोटीच्या बंधाऱ्याचे काम निधी मंजूर असून तसेच वर्क ऑर्डर असून सुरु का झाले नाही हा आमचा सवाल असून येथील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठीच हेमंत मोंडकर यांनी उपोषण छेडले आहे. जोपर्यंत या बंधाऱ्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात होत नाही तसेच बंदराच्या कामाबाबत थेटपणे ठोस असे आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत हेमंत मोंडकर यांचे उपोषण सुरूच राहील, असे यावेळी हरी खोबरेकर यांनी सांगितले.
