वाळू उपसा बंद न झाल्यास खाडीपात्रात आंदोलनाचा ग्रामस्थांचा इशारा..
⚡मालवण ता.२३-:
मालवण तालुक्यातील कालावल खाडीमधील शेलटी जेटी ते सर्जेकोट बंदर दरम्यान होणाऱ्या अनधिकृत वाळू उपशामुळे तळाशील गावाला धोका निर्माण झाला आहे, त्यामुळे हा वाळू उपसा तात्काळ बंद करावा तसेच सदर भागात वाळू उपशाचे अधिकृत टेंडर लावू नये, अशा मागण्या तळाशील ग्रामविकास मंडळातर्फे तळाशील ग्रामस्थांनी मालवणचे तहसीलदार गणेश लव्हे यांच्याकडे निवेदनातद्वारे केली. सदर वाळू उपसा बंद न झाल्यास ३० मार्च रोजी खाडी पात्रात उतरून आंदोलन छेडू, असा इशाराही ग्रामस्थानी दिला आहे.
तोंडवळी तळाशील येथील ग्रामस्थांनी मालवणचे तहसीलदार गणेश लव्हे यांची भेट घेत कालावल खाडीतील वाळू उपशाबाबत निवेदन सादर केले. यावेळी तळाशील ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष संजय केळूसकर, अजित केणी, संजय तारी, भूपाळ मालंडकर, श्रीकृष्ण रेवंडकर, संजय जुवाटकर, हनुमंत देऊलकर, सचिन मालोंडकर, दत्तात्रय तांडेल, आनंद खडपकर, नंदा कोचरेकर, ताता टिकम, आपा चोडणेकर, आनंद कोचरेकर, गणेश रेवंडकर, सुहास कोचरेकर, विद्याधर पराडकर, रवि कोचरेकर, प्रकाश बापर्डेकर, गजा कांदळगावकर, कुणाल पाटकर आदी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
कालावल खाडी पात्रात शेलटी जेटी ते सर्जेकोट बंदर दरम्या अनधिकृतपणे वाळू उपसा होत आहे. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाळू उपशामुळे तोंडवळी मधील तळाशीलच्या किनाऱ्याच्या भुभागाची प्रचंड प्रमाणात धूप होत आहे. तळाशिल येथील पिण्याचे पाणी क्षारयुक्त झाल्याने पिण्यास आरोग्यासाठी घातक ठरत आहे. तसेच तळाशिल येथील खाडी किनाऱ्यालगतची माड बागायत वाहून गेलेली असून उर्वरित माड बागायतीला खारट पाण्यामुळे धोका निर्माण झालेला आहे. तसेच या वाळू उपसामुळे खाडी किनाऱ्यालगतचा धुप प्रतिबंधक बंधारा वाहून गेलेला आहे, असे ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे.
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने एका खटल्यात अंतिम निर्णय देताना तळाशिल येथील A गटांमधील वाळु पूर्णता बंद केली होती. तळाशिल हे एक वाळुचे बेट आहे व आजुबाजुस कांदळवन प्रजाती व माशाचे प्रजनन ठिकाण असल्याने तो भाग अतिशय संवेदनशील आहे तसेच येथील दोनशे कुटुंबे मच्छिमारीवर अवलंबून आहेत. वाळू उपशामुळे त्यांचा रोजीरोटीचा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे. दिवस रात्र चालू असलेला अनधिकृत वाळू उपसा बंद न झाल्यास गावास धोका निर्माण होऊ शकतो व झालेला देखील आहे. तसेच ग्रामस्थांची नदीत वाहुन गेलेली जागा वाळुने पुन्हा भरून त्वरीत नदीकिनारी धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
कालावल खाडीतील सदर वाळू उपसा तात्काळ बंद करावा तसेच सदर भागातील वाळू उपशाचे अधिकृत टेंडर लावू नये, अशा मागण्या ग्रामस्थांनी करत सदर वाळू उपसा बंद न झाल्यास दि. ३० मार्च पासून खाडी पात्रात उतरून आंदोलन छेडू, या दरम्यान कायदा सुव्यवस्था बिघडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा यावेळी तळाशील ग्रामस्थांनी दिला.
