⚡बांदा ता.०३-:
पाडलोस येथे ओम गणेश बालसभा मंगळवारी सकाळी उत्साहात पार पडली. या बालसभेत विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, संस्कार व पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यात आले. नैसर्गिक होळी व पाणी बचतीचा संदेश देण्यात आला.
बालसभेचे अध्यक्षस्थान सानिका गावडे यांनी भूषविले. उपाध्यक्ष साईश नाईक, सचिव गौतमी केणी, सहसचिव दिशा पाडलोसकर यांनी कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन केले. यावेळी श्री स्वामी समर्थ ग्रामसंघच्या अध्यक्षा मयुरी हरिजन, सचिव संगीता गावडे, सीआरपी नेहा नाईक, लिपिका शीतल गावडे, धान्य पुरवठा दुकानदार मयुरी कुबल, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा तेजल गावडे, पाडलोस विकास सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक, आशासेविका विजया गावडे, लक्ष्मी पाडलोसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागत व प्रार्थनेने झाली. विद्यार्थ्यांनी ओळख-परिचय सत्रातून आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न केला. यावेळी नैसर्गिक रंगांचा वापर करून होळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले. रासायनिक रंगांमुळे त्वचा व पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम स्पष्ट करण्यात आले. तसेच पाण्याची बचत करणे ही काळाची गरज असल्याचे मयुरी कुबल, शीतल गावडे यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.
ग्रामीण भागात अशा प्रकारच्या बालसभांमधून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि राष्ट्रीय मूल्ये दृढ होत असल्याचे नेहा नाईक यांनी सांगितले. सूत्रसंचालन मयुरी हरिजन यांनी केले. प्रास्ताविक विजया गावडे यांनी तर संगीता गावडे यांनी आभार मानले.
चौकट——
बालवयात रुजविलेले संस्कार महत्त्वाचे
संस्कारमय संस्कृतीविषयी मार्गदर्शन करताना मोठ्यांचा आदर, पर्यावरणप्रेम, सामाजिक जबाबदारी व स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. बालवयात रुजविलेले संस्कारच पुढील आयुष्यात आदर्श नागरिक घडवतात, असे मत तेजल गावडे यांनी व्यक्त केले.
फोटो——–
पाडलोस : ओम गणेश बालसभेत उपस्थित मान्यवर व गावातील विद्यार्थी.
