स्वच्छतागृहाची दयनीय अवस्था; मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष..
⚡कणकवली ता.१३-:
जिल्ह्याचे मध्यवर्ती केंद्र असलेल्या कणकवली शहरात दररोज हजारो नागरिकांची वर्दळ असते. मात्र, याच शहरातील महत्त्वाचे केंद्र असलेल्या कणकवली पोलीस ठाण्यातील स्वच्छतागृहाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. पोलीस ठाण्याच्या इमारतीला बाहेरून रंगरंगोटी करून चकाकी देण्यात आली असली, तरी अंतर्गत मूलभूत सुविधांचा मात्र पुरता बोजवारा उडाला असून, अस्वच्छतेमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
कणकवली पोलीस ठाण्यात विविध तक्रारी, दाखले आणि शासकीय कामांसाठी नागरिक येत असतात. मात्र, येथील स्वच्छतागृहाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. स्वच्छतागृहाचा दरवाजा उघडणेही कठीण झाले असून, पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि नियमित स्वच्छतेचा अभाव यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. “बाहेरून देखणी दिसणारी इमारत आतून इतकी बकाल कशी?” असा सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत.
पोलीस निरीक्षक (पीआय) प्रशासकीय कामांत आणि गुन्हे तपासात व्यस्त असतात, हे मान्य असले तरी या मूलभूत सुविधांच्या देखभालीची जबाबदारी नेमकी कोणाची? असा प्रश्न उपस्थित होत आहे. “नागरिक स्वच्छता पाळत नाहीत” असे कारण देऊन प्रशासनाला आपली जबाबदारी झटकता येणार नाही, असे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
स्वच्छतागृहाची तात्काळ दुरुस्ती करून पाण्याची सोय करावी. दैनंदिन स्वच्छतेसाठी कायमस्वरूपी यंत्रणा कार्यान्वित करावी.सुशोभीकरणावर खर्च करण्याऐवजी मूलभूत गरजांना प्राधान्य द्यावे.शासकीय कार्यालयात किमान स्वच्छ पाणी आणि स्वच्छ स्वच्छतागृह मिळणे हा नागरिकांचा हक्क आहे. त्यामुळे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
