⚡ बारामती दि.२९-:
महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते नारायण राणे साहेबांचे अत्यंत जवळचे मित्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणासह असंख्य कार्यकर्ते व सर्वसामान्य जनतेच्या मनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राणे परिवार आणि पवार परिवार यांचे नाते हे केवळ राजकीय नसून आपुलकीचे, जिव्हाळ्याचे व दीर्घकाळचे होते—जे शब्दांत मांडणे अशक्य आहे.स्व. अजितदादा पवार यांच्या पार्थिवावर आज बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर कोकणचे सुपुत्र व आमदार श्री. निलेशजी राणे यांनी बारामती येथील पवार कुटुंबीयांच्या निवासस्थानी भेट देत कुटुंबीयांचे सांत्वन केले.
स्व. अजितदादा हे केवळ एक प्रभावी नेते नव्हते, तर दिवसरात्र जनतेसाठी झटणारे, कामातून आपली ओळख निर्माण करणारे आणि प्रत्येकाशी आपुलकीने वागणारे संवेदनशील व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या निधनाने पवार कुटुंबीयांसह महाराष्ट्राने एक कर्तबगार नेतृत्व गमावले असून ही पोकळी कधीही न भरून निघणारी आहे.
या दुःखद प्रसंगातून सावरण्यासाठी आमदार निलेश राणे यांनी पवार कुटुंबीयांना धीर देत आपल्या भावना व्यक्त केल्या.
ईश्वर स्व. अजितदादांच्या आत्म्यास सद्गती देवो आणि पवार कुटुंबीयांना हे अपार दुःख सहन करण्याचे बळ देवो, अशी प्रार्थना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
