अजित पवार यांच्या रुपाने राजकारणातील धुरंदर नेता हरपला…

राजा गावकर:अजित पवार यांना वाहिली श्रद्धांजली..

⚡मालवण ता.२८-:
महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री होण्याचा बहुमान मिळवून विक्रम करणारे तसेच राजकारणातला एक उत्तम प्रशासक, कणखर नेतृत्व, कडवट कार्यकर्ता आणी कार्यकर्त्यांचं दुःख जाणून घेणारा, कार्यकर्ते व जनतेचे प्रश्न सोडवणारा असा नेता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रूपाने आपण गमावला आहे, राजकारणातील एक धुरंधर नेता आज आपल्यात नाही, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मालवण तालुकाध्यक्ष आणि शिंदे शिवसेनेचे विद्यमान जिल्हा प्रवक्ते राजा गावकर यांनी व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात निधन झाल्यावर राजा गावकर यांनी आपल्या भावना व्यक्त करत अजित पवार यांच्याप्रति शोक व्यक्त केला. ते म्हणतात, अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याची बातमी वृत्तवाहिन्यांवर बघितल्यानंतर काळजात धस्स झाले. यां बातमीने काळजाचा ठोका चुकला आणि मनात वेदनाही झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना अजितदादां सारख्या नेत्याबरोबर पाच वर्ष काम करण्याची संधी मला मिळाली होती. मी एक सामान्य कार्यकर्ता होतो. राष्ट्रवादीचा मालवण तालुका अध्यक्ष म्हणून मी पाच वर्ष काम करण्याची मला संधी मिळाली. राष्ट्रवादीत प्रभाग अध्यक्ष पासून ते तालुकाध्यक्ष पर्यंतचा माझा प्रवास आणि या प्रवासात दीपक केसरकर, उदय सामंत, किरण पावसकर यांच्याबरोबर अजितदादा यांचाही सहवास आम्हाला लाभला. कामाच्या निमित्ताने व संघटनेच्या निमित्ताने अजित पवार यांना जवळून पाहता आले. त्यांचा रुबाब, त्यांची काम करण्याची पद्धत, बोलण्याची शैली, त्यांचा वक्तृत्वपणा हे सगळं माझ्या मनाला भावले, असे राजा गावकर म्हणाले.

अजित पवार यांच्या डिक्शनरी मध्ये बघतो, करतो हे शब्द नव्हते, कुठचंही काम घेऊन गेल्यानंतर ते जाग्यावरती त्याचा निवाडा करत असत, नारायण राणे यांच्याप्रमाणेच त्यांची काम करण्याची पद्धत होती. काम होईल कि नाही याबाबत अजित पवार यांच्यात स्पष्टवक्तेपणा होता असे नमूद करून गावकर यांनी अजितदांदाच्या अलीकडच्या मालवण भेटीविषयी बोलताना
मालवण मध्ये राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्यावेळी कोसळला त्यावेळी भेट देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आले होते, त्यावेळी त्यांच्याशी झालेल्या भेटीत मी पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये तालुकाध्यक्ष होतो एवढे सांगल्यावर बरोबर अजित दादांनी “अरे हो पण आत्ता कुठे आहेस” असे विचारले होते. त्यावेळी मी शिंदे शिवसेना तालुकाप्रमुख म्हणून काम करतोय असे सांगितल्यावर त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवत “हे माझं दुर्दैव” असे म्हटले होते. त्यावेळी दादांचे हे शब्द काळजाला चटका लावून गेले. आज अजितदादा यांच्या फक्त आठवणी राहिल्या आहेत. एक उत्तम प्रशासक, प्रशासनावर चांगली पकड व चांगली जरब असणारा नेता महाराष्ट्राने गमावला आहे. अजितदादांच्या या अकाली जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे असेही राजा गावकर यांनी म्हणत स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे .

You cannot copy content of this page