⚡मालवण ता.११-:
शासनाच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध आहे. प्रधानमंत्री आवास योजनेमुळे अनेक कुटुंबांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार होत आहे असे प्रतिपादन सरपंच रश्मी टेंबुलकर यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत आनंदव्हाळ – कर्लाचाव्हाळ ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील मंजूर घरकुलांचा मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांना हक्काचे पक्के घर मिळावे, या उद्देशाने शासनामार्फत ही योजना राबवली जात आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या घराच्या कामाचा श्रीगणेशा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायतीच्या सरपंच रश्मी टेंबुलकर यांच्यासह ग्रामपंचायत अधिकारी लक्ष्मण सरमळकर, पोलीस पाटील दशरथ गोवेकर, ग्रामपंचायत सदस्य अनिल सुकाळी, कर्मचारी विजय चव्हाण, अवंतिका सांडव, माजी सरपंच रवींद्र टेंबुलकर, रोजगार सेवक अश्विनी सुकाळी, परिचारिका सरमळकर, अरविंद वाक्कर, शुभांगी वाक्कर आणि संतोष वाक्कर आदी उपस्थित होते.
ग्रामविकास अधिकारी सरमळकर यांनी घरकुल योजनेच्या तांत्रिक बाबींची आणि पुढील टप्प्यांची माहिती उपस्थितांना दिली.
