आनंदव्हाळ-कर्लाचाव्हाळ ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम…
⚡मालवण,ता.२९-:
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत आनंदव्हाळ-कर्लाचाव्हाळ यांच्या वतीने आज कदमवाडी येथे लोकसहभागातून वनराई बंधारा बांधण्यात आला. जलसंधारणाचे महत्त्व ओळखून आणि गावच्या पाणीटंचाईवर मात करण्याच्या उद्देशाने ग्रामस्थांनी श्रमदानातून हा बंधारा पूर्ण केला.
या उपक्रमासाठी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. बंधाऱ्यामुळे परिसरातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार असून शेती व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
यावेळी ग्रामपंचायतीच्या सरपंच रश्मी रवींद्र टेंबुलकर आणि उपसरपंच दिलीप गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी लक्ष्मण सरमळकर, कर्मचारी विजय चव्हाण, केंद्र चालक प्रिशा बांदल, ग्रामपंचायत सदस्य अनिल सुकाळी आणि माजी सरपंच रवींद्र टेंबुलकर, तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत घाटगे, पाणी कर्मचारी अनंत नांदोसकर आदी सहभागी झाले होते.
हा बंधारा यशस्वी करण्यासाठी गावातील तरुणांनी आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रमदान केले. यामध्ये रमेश बांदल, दुर्गेश परब, गौरव कदम, मनोहर बांदल, लाजरी परब, चिन्मय परब, तनिष बांदल यांसह अन्य ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग होता.
गावाच्या विकासासाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ‘लोकसहभागातून ग्रामविकास’ हे ब्रीदवाक्य या निमित्ताने खऱ्या अर्थाने सार्थ ठरल्याची भावना सरपंच रश्मी टेंबुलकर यांनी यावेळी व्यक्त केली.
