⚡मालवण,ता.२२-:
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ आणि ‘स्वच्छता ही सेवा २०२५’ या उपक्रमाचे औचित्य साधून आज आनंदव्हाळ-कर्लाचाव्हाळ ग्रामपंचायत येथे विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय आणि आजूबाजूच्या परिसराची संपूर्ण साफसफाई करण्यात आली.
गावाचा परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेत लोकप्रतिनिधी, कर्मचारी आणि ग्रामस्थांनी हिरहिरीने सहभाग घेतला. यावेळी उपस्थितांनी श्रमदान करून कार्यालय परिसर चकाचक केला.
या स्वच्छता मोहिमेत सरपंच रश्मी रविंद्र टेंबुलकर, ग्रामपंचायत सदस्य श्रुती शैलेश सुकाळी, अनंत नांदोसकर, शिक्षिका स्मिता चौकेकर, अंगणवाडी सेविका विलासिनी सुकाळी, मदतनीस अन्वी सडवेलकर, ग्रामपंचायत कर्मचारी विजय चव्हाण, केंद्रचालक प्रिशा बांदल, अवंतिक सांडव, चंद्रकांत घाटगे, शिवराम सांडव तसेच विद्यार्थी सान्वि सडवेलकर आणि भार्गव मांजरेकर आदी सहभागी झाले होते.
आपले गाव स्वच्छ ठेवणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे असा संदेश यावेळी सरपंच रश्मी टेंबुलकर यांनी दिला. या अभियानामुळे ग्रामपंचायत परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून, अशा उपक्रमांमुळे गावच्या समृद्धीला चालना मिळेल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
आनंदव्हाळ-कर्लाचाव्हाळ येथे ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ अंतर्गत स्वच्छता मोहीम…
