शोषणमुक्त समाज निर्माण करणे हीच खरी बिंदुमाधव जोशी यांना आदरांजली ठरेल…

बिंदुमाधव जोशी यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित;ऑनलाईन कार्यक्रमात डॉ.विजय लाड यांचे प्रतिपादन._

*💫वैभववाडी दि.११-:* भारतीय ग्राहक चळवळीचे जनक, ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष, ग्राहक संरक्षण कायद्याचे जनक, ग्राहक कल्याण उच्चाधिकार समितीच्या अध्यक्ष पदाचा प्रथम मान मिळविणारे,थोर स्वातंत्र्यसेनानी ग्राहकतीर्थ स्व. बिंदुमाधव जोशी (नाना) यांनी १९७४ मध्ये ग्राहक पंचायतीची स्थापना केली. ग्राहक चळवळीच्या माध्यमातून ग्राहकाचे संघटन, ग्राहक जागृती बरोबरच ग्राहक संरक्षणार्थ हक्कासाठी लढा दिला. यातूनच १९८६ मध्ये ग्राहक संरक्षण कायदा पारित झाला. शोषणमुक्त समाज निर्माण करण्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. त्यांचे अपूर्ण कार्य पूर्ण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे आणि हीच खरी बिंदुमाधव जोशी यांना आदरांजली ठरेल असे प्रतिपादन ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे राज्याध्यक्ष डॉ.विजय लाड यांनी केले. १० मे २०१५ रोजी बिंदुमाधव जोशी यांचे दुःखद निधन झाले. १० मे २०२१ रोजी सहाव्या स्मृतिदिनानिमित्त ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्था व जळगाव जिल्हा शाखेच्यावतीने बिंदुमाधव जोशी यांना अभिवादन करण्यासाठी ऑनलाइन राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे राज्याध्यक्ष डॉ. विजय लाड यांच्या अध्यक्षतेखाली केले होते. यावेळी ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करण्यात आले. या कोरोना महामारीने निधन पावलेले कार्यकर्ते, पदाधिकारी, समाजातील मान्यवर मंडळींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. या प्रसंगी सौ. मेघाताई कुलकर्णी उस्मानाबाद यांनी प्रास्ताविक तर कोकण विभागचे प्रा.श्री. एस. एन. पाटील, शहादा येथील प्रा.चंद्रकांत डागा, राज्य सचिव श्री.अरूण वाघमारे यांनी मनोगत व्यक्त करून मार्गदर्शन केले. राज्याध्यक्ष डाॅ. विजय लाड यांनी जोशी यांचा अनुभव सांगतांना १००० कार्यकर्त्यांचा संकल्प व्यक्त केला. तसेच ग्राहकतीर्थ स्व. बिंदुमाधव जोशी यांच्या स्मृतीदिनानिमित्त पोस्ट तिकीट काढण्यासंदर्भात संस्थेचे प्रयत्न सुरू असल्याचे सचिव श्री.अरुण वाघमारे यांनी सांगितले. सदर कार्यक्रमाला संस्थेचे राज्य पदाधिकारी, विभाग, जिल्हा व तालुका स्तरावरील कार्यकर्ते हितचिंतक उपस्थित होते. ऑनलाईन फेसबूक व युट्यूबद्वारा १३४५ व्यक्ती उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. महेश चावला यांनी केले. तांत्रिक आयोजन श्री. नविन चावला यांनी तर आभार जळगाव जिल्हाध्यक्ष मनोज जैन यांनी मानले.

You cannot copy content of this page