*💫मालवण दि.११-:* देशात १ लाख ६५ हजार पोस्ट कार्यालयाद्वारे अत्यावश्यक सेवेखाली ३ लाख ग्रामीण डाकसेवक काम करीत आहेत. मात्र सेवा बजावताना त्यांना कोरोनाची लागण होत असल्याने ग्रामीण डाकसेवकांना केंद्र सरकारने ५० लाखाचे विमा कवच लागू करावे, जेणे करून त्यांच्या कुटूंबाला याचा लाभ व आधार मिळेल, अशी मागणी ग्रामीण डाकसेवक युनियन सिंधुदुर्गचे माजी जिल्हाध्यक्ष अभिमन्यू धुरी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. ग्रामीण डाक सेवक हे पोस्ट कार्यालयाद्वारे स्पीड पोस्ट, पार्सल, आर.डी., एस.बी. सुकन्या ग्रामीण टपाल, जीवन विमा, इंडियन पोस्ट पेमेंट, बँक पैसे देणे घेणे, फिक्स डिपॉझिट आदी सेवा अविरत पणे देत आहेत. मात्र सेवा बजावताना डाक सेवकांना कोरोनाची लागण होत आहे. टपाल खाते व जनता यांचा संबंध येत असल्याने पोस्ट मास्तर व ग्रामीण पोस्टमन यांना विमा कवच केंद्र सरकारने लागू करणे गरजेचे आहे, असे अभिमन्यु धुरी यांनी म्हटले आहे. तसेच ग्रामीण डाकसेवक हा ग्रामीण भागात काम करत असल्यामुळे केंद्र सरकारने त्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करणे व दोन्ही डोस त्या त्या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध करून देणे महत्वाचे आहे. ग्रामीण डाकसेवक लसीकरणापासून वंचित राहत नये यासाठी खासदार, आमदार यांनीही लक्ष घालावे अशी मागणी अभिमन्यू धुरी यांनी केली आहे. कोरोना महामारीने दुसऱ्या लाटेत उग्र रूप धारण केले आहे. त्यामुळे शासनाने गतवर्षी प्रमाणे उपाययोजना राबवून महामारीवर नियंत्रण मिळवावे. देशाच्या इंजिनाप्रमाणे असणारा प्रत्येक कर्मचारी आज कोरोनामुळे जगू शकत नाही. पर्यटन, मच्छीमारी व्यवसाय देखील अडचणीत आले आहेत. त्यामुळे खासदार आमदार यांनी गरीब कष्टकरी जनतेला कोरोना सहाय्यता निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत असेही धुरी यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
ग्रामीण डाकसेवकांना विमा कवच लागू करावे-: अभिमन्यू धुरी…
