घारपी शाळेत बालदिन विविध उपक्रमांनी बनला आनंददीन…

⚡बांदा ता.१४-: घारपी येथील जिल्हा परिषद शाळेत बालदिन मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. शाळेत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांनी विद्यार्थ्यांच्यासाठी हा दिवस आनंददायी ठरला. या दिवशी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडा उपक्रमांमधून चाचा नेहरूंना आदरांजली अर्पण केली.
कार्यक्रमाची सुरुवात नेहरूंच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन आणि पुष्पार्पण करून झाली यावेळी प्रार्थना, देशभक्तीपर गीते सादर केली . या दिवशी शाळेतील विद्यार्थी बळीराम गावडे याने चाचा नेहरू यांची लक्षवेधी वेशभूषा साकारली होती.
या दिवशी विद्यार्थ्यांच्या हातावर मेहंदी रेखाटन, तसेच संगीतखूर्ची,लिंबूचमचा,बादलीत चेंडू टाकणे ,रस्सीखेच असे विविध प्रकारचे पारंपरिक व मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले‌ . यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
मुख्याध्यापक श्री जे.डी.पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की
बालदिन हा मुलांच्या निरागसतेचा आणि स्वप्नांचा उत्सव आहे. त्यांच्या शिक्षणात, कल्पकतेत आणि संस्कारांत गुंतवणूक केली तर राष्ट्र अधिक सक्षम होईल.
शाळेच्या शिक्षकांनी बालदिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून देत विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी, शिस्त आणि एकतेचा संदेश दिला.
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सहकारी शिक्षक धर्मराज खंडागळे, मुरलीधर उमरे, आशिष तांदुळे अंगणवाडी सेविका संजना गावकर, मदतनीस अमृता कविटकर, संचिता सावंत यांनी परिश्रम केले. दिवसभर शाळेच्या परिसरात आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.बालदिनाचा हा सोहळा घारपी शाळेत खऱ्या अर्थाने आनंददीन ठरला.

You cannot copy content of this page